ज्येष्ट कवी अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन : लोकमान्य रंगमंदिर येथे ‘मराठी आठव दिवस’ साजरा : कार्यक्रमाने प्रेक्षकांना केले अंतर्मुख
प्रतिनिधी /बेळगाव
सध्याचे एकूण वातावरण किंवा भवताल पाहता ‘एक मॅडनेस सर्वत्र भरून राहिला आहे, असे वाटते. या मॅडनेसकडून पुन्हा माणूसपणाच्या वाटेवर येण्यासाठी कवी व लेखकांना काम करावे लागेल आणि मराठीचे वैभवही जपावे लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ट कवी अशोक नायगावकर यांनी केले.
मराठी भाषा प्रसार व संस्कृती संवर्धन पुणे या संस्थेच्या बेळगाव शाखेतर्फे स्वामीराज प्रकाशनच्या सहकार्याने रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे ‘मराठी आठव दिवस’ साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनापुरताच मराठीचा महिमा गौरविण्याऐवजी दर महिन्याच्या 27 तारखेला स्वामीराज प्रकाशनतर्फे मराठी आठव दिवस साजरा केला जातो. रविवारी बेळगावमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अशोक नायगावकर आणि विडंबनकार महेश केळुस्कर यांचा ‘मस्करीका’ हा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर व पत्रकार रजनीश राणे उपस्थित होते.
कविता वाचन, विडंबन गीत, हास्य आणि विनोद यांनी सजलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना पुरेपूर हसविले. परंतु, त्याचवेळी अंतर्मुखही केले. ‘बऱया बोलाने गा, बोला मराठीत, तुकयाचे हाती सोटा आहे’, अशी सुरुवातच करत नायगावकर यांनी मराठीचे वैभव अधोरेखित करत तिला जपण्याचे आवाहन केले. मराठी भाषा किती लवचिक आहे, कारण या भाषेतच ‘चोराच्या मनातसुद्धा चांदणे सापडते’, असा दाखला देत त्यांनी अलीकडे वातावरण इतके गढूळले आहे की सर्वत्र भिऊन राहावे लागते. देश म्हणजे फक्त फेस आहे की काय? असे सांगताना फेसयुक्त साबणाच्या जाहिरातींवर त्यांनी भाष्य केले. भारतात गल्लोगल्ली झालेल्या बारबद्दल खंत व्यक्त करतानाच हा देश ‘बारत’ होतो की काय? अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडत महेश केळुस्कर यांनी,
‘तुम्ही माझे हातपाय बांधा,
मुसक्मया बांधा तरी मी बोलणारच, डोळय़ांनी
आणि रस्ते रोखलेत तरीही मी चालत राहीन
नव्या वाटा काढत’
ही कविता सादर करत सर्वत्र विचित्र जाळ पेटलेला आहे. परंतु, कधीतरी ही आग विझेलच, असा आशावादही व्यक्त केला. त्यांनीच गुऱहाळावरची एक कविता सादर केली. नायगावकर यांनी ‘ऐलम्मा पैलम्मा’च्या धर्तीवर ‘काल कोण आत गेलं? उद्या कोण आत येणार?’ ही कविता सादर केली. आज गद्यप्राय देशामध्ये सतत मुलांमध्ये वावरलेले शिक्षकसुद्धा बालबुद्धीचेच झाले आहेत का? असा प्रश्न करत टीव्हीमुळे लोक निरक्षर झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्यांनीच ‘टिळक’ ही कविता सादर करत अनेक किस्सेही सांगितले. महेश केळुस्कर यांनी 35 वर्षे झाली तरी आजही तितकीच टवटवीत असणारी ‘झिनझिनाट’ ही कविता सादर केली. नायगावकर यांनी ‘माय’ ही कविता सादर केली.
कवितांच्या बरोबरीने अनेक किस्से कवींनी सांगितले. त्यांच्या सादरीकरणाची शैली आणि अर्थपूर्ण आशयामुळे रसिक मनमुराद हसले तरी कवितांमधला गर्भितार्थ ओळखून अंतर्मुखही झाले. प्रारंभी किरण ठाकुर आणि कवींच्या हस्ते हुतात्मा स्मारकाच्या प्रतिकृतीवर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. किरण ठाकुर यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
किरण ठाकुर यांनी मराठी भाषा प्रसार समिती स्थापण्याची गरज व्यक्त करतानाच सीमावासीयांच्या वेदना पोटतिडकीने मांडल्या. स्वामीराज प्रकाशनतर्फे किरण ठाकुर यांचा तसेच सूत्रसंचालक मनीषा सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला. विनायक जाधव यांनी आभार मानले.