गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाममधील चराईदेव जिल्हय़ासह अप्पर आसाममधील चार जिल्हय़ांमध्ये विषारी मशरूमच्या (अळंबी) सेवनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला होता. 6 एप्रिल रोजी जिल्हय़ातील लालतीपठार गावात जंगली मशरूम खाल्ल्याने महिला चहाबाग कामगार आणि त्यांच्या मुलांसह एकूण 15 लोक आजारी पडले होते. आसाममधील चार जिल्हय़ांमध्ये या मृत्यूंची नोंद झाली असून सोमवारी 4 रुग्णांचा तर मंगळवारी 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. प्रशांत दिहिंगिया यांनी सांगितले. विषारी मशरूमच्या सेवनामुळे मृत्यूची प्रक्रिया 6 एप्रिलपासून सुरू झाली असून बुधवारपर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता दिब्रुगड, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्हय़ातूनही अशी प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. या चार जिल्हय़ांमधून सुमारे 35 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्व पीडितांची विषारी मशरूम खाल्ल्यानंतर प्रकृती खालावली होती.