राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला टोला
जम्मू / वृत्तसंस्था
तेविसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराच्या बलिदानाचे स्मरण केले. याप्रसंगी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठासून सांगत त्यांनी पाकिस्तानला टोला लगावला. पीओके हा भारताचाच होता, भारताचाच आहे आणि भारतातच राहणार असे त्यांनी ठासून सांगितले.
जम्मू दौऱयावर आलेले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात वक्तव्य केले. पीओके हा भारताचा भाग असल्याचे नमूद करतानाच यासंदर्भात संसदेत एकमताने ठरावही मंजूर करण्यात आल्याची पुष्टी त्यांनी जोडली. कारगिल विजय दिवस सोहळय़ात सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबाळे जम्मूमध्ये पोहोचले होते.