पोलीस खुन्यापर्यंत पोहचण्यात अपयशी
प्रतिनिधी /कुडचडे
बाणसाय-कुडचडे येथे झालेल्या खुना संबंधित सर्व माहिती पोलिसांच्या गुलदस्त्यात राहिली आहे. या खून प्रकरणात सध्या पोलिसांनी मौनव्रत धारण केले आहे. त्यात काही जणांना तपासाठी बोलावले आहे. त्यांचे नातेवाईक पोलीस स्थानकाच्या बाहेर गेले दोन दिवसांपासून ठाण मांडून बसलेले दिसून येत आहेत.
बाणसाय येथे कामगारांचा झालेला खुनाचा तपास सांगे येथील कॅम्पमध्ये सुरु असून तपासासंदर्भात पूर्णपणे गुप्ताता राखली आहे. सध्या सुरू असलेली कारवाई हा केवळ दिखावा असल्याचे मत आत्ता सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
हा प्रकार चोरीचा नसून एका कामगारांचा जीव येथे गेलेला आहे याची दखल घेऊ तरी पोलिसांनी कारवाई वर जोर द्यावा असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. सद्या आरोपी जवळ पोहोचण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील कित्येक जणांना संशयित म्हणून तपासासाठी आणण्याचे सत्र सुरूच आहे. या संबंधित काही स्थानिक लोक पोलिस स्थानाकावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बायणा येथे झालेल्या खुनाची माहिती ऐकून काल सोमवारी लोकांत अधिक तीव्र संताप व्यक्त होताना दिसू लागला आहे. सद्या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णता कोलमडली असून यावर ताबडतोब नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा शेवटच्या वेळेस नियंत्रण ठेवणे काठीण होत जाईल यांची दखल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घ्यावी असे कुडचडेतील लोकांनी मत व्यक्त केले आहे.
पूर्वीच्या घटनेकडे का दुर्लक्ष केले
बाणसाय येथे रेती उत्खनन करणाऱया एका कामगाराचा गोळी झाडून खून करण्यात आला असाच प्रकार यापूर्वी जानेवारी महिन्यात घडला असल्याची चर्चा या भागात जोरात सुरू आहे. मात्र, त्यावेळी हे प्रकरण दडपले गेले. त्यावेळीच पोलिसांनी गांभीर्याने लक्ष केंद्रीत केले असते व संबंधितांवर कारवाई केली असती तर बाणसाय येथील घटना टळली असती अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
मुळात रेती उपसा करण्यावर न्यायालयाने बंदी घातली असताना देखील कुडचडे परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन केले जात असे. हे बेकायदा रेती उत्खनन राजकीय आशीर्वादानेच सुरू होते. राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय कुणीच बेकायदा रेती उत्खनन करण्याचे धाडस केले नसते अशा प्रतिक्रीया देखील या भागातून व्यक्त होत आहे.