10 दिवस पुरेल इतकाही नाही पाणीसाठा : पाणी आणीबाणी लागू ः 24 तास असणार बंदोबस्त
वृत्तसंस्था / जोधपूर
राजस्थानच्या जोधपूरमध्ये पाणी आणीबाणी लागू करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे संकट तेथे गडद झाले आहे. तेथील पाणीपुरवठा अडचणीत आला आहे. पंजाबमधून पाणी येण्यास विलंब होणार असल्याने जोधपूरमधील पाणीसाठय़ात शिल्लक असलेल्या पाण्यातूनच तहान भागवावी लागणार आहे. पंजाबमधून पाणी येण्यास अद्याप 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. स्थिती पाहता जोधपूर प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाकडून पुरवठय़ाची जबाबदारी स्वतःच्या हातात घेत पाणीसाठय़ांवर पहारा बसविला आहे.
60 दिवसांच्या कालवाबंदीमुळे जोधपूरमध्ये पुरवठय़ासाठी पाण्याचा साठा अत्यंत जपून वापरला जात होता. पंजाबमध्ये आता कालवा फुटल्याने पाणी येण्यास आणखीन 10 दिवस लागणार आहेत. जोधपूरकडे आता 10 दिवस पुरू शकेल इतकाही पाणीसाठा नाही. पाण्यावरून निर्माण झालेल्या स्थितीमुळे प्रशासनही सतर्क झाले आहे.
जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी शहरात संभाव्य पेयजल समस्या पाहता पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी आपत्कालीन प्रतिसाद टीमची स्थापना केली आहे. याच्या अंतर्गत शहराच्या फिल्टर प्रकल्पांवर 24 तास पोलीस तैनात ठेवण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी 4-5 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पाण्यावर पहारा बसविण्यात आल्याने प्रत्येक थेंबाचा जपून वापर केला जाणार आहे.
शहरात जलसंकट निर्माण झाल्याने प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर पाणी वाचविण्यासाठी जनतेत जागरुकता निर्माण केली जात आहे. लोकांना सतर्क करण्यासह स्थितीत संयम राखण्याचे आवाहन केले जात आहे.
4 जूनपर्यंत राहणार संकट
कालवाबंदीचा कालावधी वाढल्याने शहरात पाणीपुरवठा आता 72 तासांनी केला जात आहे. प्रस्तावित 60 दिवसांची कालवाबंदी 21 मेपर्यंत पूर्ण होणर आहे. परंतु पंजाबमध्ये कालवा फुटल्याने आणि दुरुस्तीच्या कामामुळे कालवाबंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जोधपूर शहराच्या जलाशयांमध्ये पुरेसा साठा ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.