ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना ऑनडय़ुटी सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या माध्यमातून निशुल्क प्रवास करण्याची विशेष सोय होती. मात्र, आता वित्त विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेत हा निशुल्क प्रवास बंद केला आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना आता बस किंवा बेस्टने प्रवास करताना तिकीट काढावे लागणार आहे.
का बंद करण्यात आला हा निशुल्क प्रवास?
सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून निशुल्क प्रवास करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून प्रत्येकी दरमहा 2700 रुपये तर अधिकाऱ्यांच्या खात्यातून 5400 रुपये प्रवास भत्ता कपात करण्यात येत होता. हे पैसे सार्वजनिक वाहतुकीसाठी दिले जात होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना सार्वजनिक शासकीय वाहनांमधून विना तिकीट प्रवास करता येत होता. दरम्यान, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे खासगी वाहने आहेत. तर काही जण लोकलने प्रवास करतात. त्यामुळे सार्वजनिक शासकीय वाहनांचा वापर न करणाऱ्या पोलीसांना या प्रवास भत्ता कपातीचा मोठा फटका बसत होता. त्यामुळे ही प्रवास भत्ता कपात थांबविण्याची मागणी पोलिसांकडून होत होती. त्यानंतर वित्त विभागाने पोलिसांचा प्रवास भत्ता न कापण्याचा मोठा निर्णय घेतला. आता पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खात्यातून हे पैसे कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना अप्रत्यक्षपणे ही पगारवाढच मिळाली असे म्हणायला हरकत नाही.
बेस्टला मोठा फटका
वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बेस्टला बसला आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने बेस्टला दरमहा एक लाख रुपये मिळत होते. मात्र, पोलिसांचा निशुल्क प्रवास बंद झाल्याने हे पैसे बेस्टला मिळणार नाहीत.