कोल्हापूर उत्तरचे चित्र : राजेश क्षीरसागर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर राजकीय समिकरणे बदलली : पवार, देवणे, इंगवले, मोदी, सुर्वे, देवकुळे यांच्यावर जबाबदारी, भाजपशी सामना करावा लागणार
संजीव खाडे/कोल्हापूर
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी शिंदे गटाची साथ दिल्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या शिवसेनेची वाट आणि चाल बिकट बनली आहे. त्यामुळे आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेत असणाऱया जुन्या, जाणत्या शिवसैनिकांना शहरातील सेना बळकट करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. पक्ष बळकट करण्याचे आव्हान पेलावे लागणाऱया शिवसेनेला शिंदे गट-भाजप यांचा सामना तर करावाच लागणार आहे, पण त्याचबरोबर बदलत्या राजकीय समिकरणानुसार राजकीय ताकदही वाढविण्यासाठी थेट जनतेत उतरावे लागणार आहे.
माजी आमदार सुरेश साळोखे यांच्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने कोल्हापूर शहरात शिवसेनेचे नेतृत्व पुढे आले. त्यांनी दोनवेळा आमदारकीही भूषविली. शहर शिवसेनेवर त्यांचे नियंत्रण राहिले. पण त्यांना कोल्हापूर महापालिकेवर कधीही सत्ता आणता आली नाही. सुरेश साळोखे यांच्याप्रमाणे क्षीरसागर यांनीही शिवसेना आमदारकी पुरती मर्यादित ठेवल्याने महापालिकेत सेना नगरसेवकांची संख्या दुहेरी आकडा पार करू शकली नाही. दरवेळी सेनेचा भगवा फडकणार अशा वल्गना झाल्या पण विधानसभा निवडणुकीची सोय म्हणून नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर महापालिकेला निवडणुकीच्या वेळी केलेले साटेलोटे सेनेला महागात पडले. आता क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केल्यानंतर कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाची समिकरणेही बदलली आहेत.
पुर्वी शिवसेना-भाजप युतीमुळे कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेकडे असे. 2019 मध्ये युतीतून लढलेल्या शिवसेनच्या क्षीरसागरांना काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी हरवले. पोटनिवडणुकीत कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसकडेच राहिली. आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव निवडून आल्या. जाधव यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित कदम यांना 78 हजार मते मिळाली. मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित लढूनही भाजपने घेतलेली मते लक्षवेधी ठरली. त्यानंतर आता क्षीरसागर यांच्या शिंदे गटात जाण्याने आणि शिंदे गटाची असणारी भाजपची साथ यामुळे आगामी काळात कोल्हापूर उत्तरमधील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलणार आहे. संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, रवि चौगुले, विनायक साळोखे, विशाल देवकुळे या जुन्या आणि सध्या सेनेत असणाऱया आजी माजी पदाधिकाऱयांना शहरात शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राबावे लागणार आहे. त्यांना एकाचवेळी शिंदे गट, भाजप यांच्याशी सामना करत राजकीय ताकद निर्माण करावी लागणार आहे.
पक्षाच्या महिला, युवा आघाडीसह विविध सेलची नव्याने बांधणी करावी करतानाच शिवसेनेतून शिंदे गटात आऊट गोईंग होणार नाही ना? यावरही नजर ठेवावी लागणार आहे. क्षीरसागर यांच्याबरोबर खासदार संजय मंडलिक यांनीही शिंदे गट जवळ केला. मंडलिक यांची शहरात काही भागात ताकद आहे. क्षीरसागर आणि मंडलिक सत्तेबरोबर असल्याने सत्तेचे लाभ घेत ने शहरातील मूळ शिवसेना कमकुवत करण्याचे प्रयत्न करणार हे उघड आहे. त्यांचा सामना पवार, देवणे, इंगवले, मोदी, सुर्वे कसा करतात यावर शहर सेनेचे भवितव्य अवलंबून आहे.
2024 च्या विधानसभेत कोण लढणार?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून शिंदे गट किंवा भाजपचा उमेदवार असणार हे नक्की. राजेश क्षीरसागर किंवा सत्यजीत कदम यांच्या पैकी कुणाला संधी मिळणार हे त्यावेळीच स्पष्ट होईल. महाविकास आघाडी झाली तर काँग्रेस किंवा शिवसेनेचा उमेदवार असू शकतो. काँग्रेस विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना संधी देऊ शकते. ऐनवेळी माजी आमदार मालोजीराजेंना मैदानात उतरवू शकते. शिवसेनेकडून संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले यांची नावे पुढे येऊ शकतात.