शनिवारी एकाच दिवशी भाजप-महागठबंधनच्या जाहीर सभा, लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमध्ये शनिवारचा दिवस राजकीय धुमश्चक्रीचा ठरला आहे. या एकाच दिवशी पूर्णिया येथे महागठबंधन तर बगहा येथे भाजपची प्रचंड सभा झाली. महागठबंधनच्या महासभेत माजी मुख्यमंप्ती लालूप्रसाद यादव आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भाषणे झाली. तर भारतीय जनता पक्षाच्या प्रचंडसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणशिंग फुंकले. दोन्ही राजकीय शक्तींनी एकमेकींवर आरोप-प्रत्यारोपांचा वर्षाव या दोन सभांमधून केला
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींच्या हातीच पुन्हा एकदा सत्ता येणार आहे. भारतातील मतदारांचा त्यांच्यावर विश्वास असून त्यांनाच जनतेचा निर्विवाद कौल मिळेल. देशाचा चहुमुखीं विकास हेच भाजपचे ध्येय आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे जीवनमान उंचालण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे भाजपचा विजय सुनिश्चित आहे. विरोधी पक्षांना जनता जवळ करणार आहे, असा ठाम विश्वास शहा यांनी व्यक्त केला. शेतकरी, दलित, दुर्बळ घटक यांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. या सरकारच्या आतापर्यंतच्या काळात केवळ हेच ध्येय दृष्टीसमोर ठेवून कार्य करण्यात आलेले असून जनतेला याची माहिती आहे, असे प्रतिपादन शहा यांनी केले.
विरोधी पक्षांचा विजय निश्चित
दुसऱया बाजूला पूर्णिया येथे झालेल्या महागठबंधनच्या सभेत माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळय़ात शिक्षा भोगलेले लालूप्रसाद यादव यांनी भाजपच्या विरोधात आघाडी उघडली. 2024 मध्ये भाजपचा विजयरथ बिहारच रोखणार आहे. भाजपला विजय मिळणार नाही. पंतप्रधान मोदी यांचे सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे. संघाचे विचार देशाला मागे नेणारे आहेत. संघ समाजात फूट पाडत आहे. दलित आणि इतर दुर्बळ घटकांवर संघाने अनन्वित अन्याय केला आहे, असे अनेक आरोप करताना लालू यादव यांनी संघाचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर यांच्यावरही तोंडसुख घेताना भाजपचे पतन होणार असे भाकित त्यांनी केले.
नितीश कुमारांचा दावा
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही भाजपवर टीका केली. राज्यात मोठय़ा प्रमाणावर शिक्षकांची भरती केली जाईल. शिक्षकांचे वेतनही वाढविण्यात येईल, अशी आश्वासने त्यांनी दिली. कुमार यांच्या भाषणाआधी सभेत प्रचंड गोंधळ आणि गदारोळ झाला. अनेकांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर नितीशकुमार यांनी नोकरभरतीचे आश्वासन दिले. तेजस्वी यादय यांनीही आपण कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही, असे आश्वासन लोकांना दिले.
पुन्हा नितीशकुमारांना प्रवेश नाही
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे आपला विकासवाद सोडून संधीसाधू झाले आहेत. त्यांना दर तीन वर्षांनी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पडते. त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आता भाजप नितीशकुमार यांच्याशी कधीही युती करणार नाही. त्यांना आता आमच्यात प्रवेश कधीच मिळणार नाही. सत्तेच्या अनाठाई महत्वाकांक्षेपोटी त्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
लोकसभा प्रचाराचे रणशिंगच
महागठबंधन आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही राजकीय शक्तींनी शनिवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे जणू रणशिंगच फुंकले आहे, अशी प्रतिक्रिया या दोन्ही सभांच्या नंतर अनेकांनी व्यकत केली आहे. लोकसभा निवडणुकीत कसा प्रचार होईल, याची चुणूकच या सभांमध्ये पहावयास मिळाली. बिहारमध्ये राजद-संजद-काँगेस युतीशी भाजपला दोन हात करायचे आहेत. शहा यांच्या सभेतून याचे प्रत्यंतर आले, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे.
स्टिंगर क्षेपणास्त्राचा धोका
अमित शहा यांचा हा बिहार दौरा गेल्या पाच महिन्यांमधील तिसरा आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली होती. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्टिंगर क्षेपणास्त्रे मिळविली आहेत, अशी माहिती गुप्तचरांनी दिल्याने प्रशासनाने अधिक दक्षता बाळगली होती. या दौऱयाआधी शहा यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख होती.
आरोप-प्रत्यारोप
ड बिहारमध्ये पुन्हा गुन्हागारांचे वर्चस्व निर्माण झाल्याचा शहा यांचा आरोप
ड भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्याचा महागटबंधनकडून आरोप
ड नितीशकुमारांनी संधीसाधूपणा करुन विश्वासघात केल्याचा शहांचा आरोप
ड पुन्हा नितीशकुमार यांच्याशी युती करणार नसल्याची शहा यांची घोषणा