उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
प्रतिनिधी/ बेंगळूर
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस आहे. सायंकाळपर्यंत निवडणूक आखाड्यात कोणकोणते उमेदवार राहतील, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी राजकीय पक्षांनी मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याचप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांची फौज तयार ठेवली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराला जोर येणार आहे. विविध राजकीय पक्षांमधील तिकीट वंचितांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विजयात अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे बंडखोरी केलेल्यांशी बोलणी करून त्यांना अर्ज मागे घेण्याबरोबरच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला जात आहे. जर अर्ज मागे न घेतल्यास त्या बंडखोर उमेदवाराला शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 224 मतदारसंघांमध्ये एकूण 3,130 उमेदवार आहेत. त्यामध्ये 2,890 पुरुष तर 239 महिला उमेदवारांचा समावेश आहे. एका तृतीयपंथी उमेदवाराचाही अर्ज वैध आहे. भाजपमधून 224, काँग्रेसमधून 223, निजदमधून 211, आम आदमी पक्षाचे 212, बसपचे 137, सीपीआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 4, नोंदणीकृत पक्षातील 736 आणि 1,379 अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणूक आखाड्यात लढतीसाठी किती उमेदवार उतरतील हे चित्र स्पष्ट होणार आहे.