कोणाची मंत्रीपदे तर कोणाची खाती जाणार : भाजप मंत्रिमंडळात कमालीची अस्वस्थता
विशेष प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या 8 आमदारांना भाजपमध्ये घेतल्याने भाजपचे संख्याबळ 20 वरून 28 आणि सरकारचे एकूण संख्याबळ 33 पर्यंत पोहोचले खरे! मात्र आता कोणाचा बळी जाणार? कोणाची खाती जाणार? यावरून मंत्रिमंडळात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे. शिवाय मंत्र्यांकडील महामंडळेही काढून घेऊन ती नव्या आमदारांना दिली जाणार असल्याने राजकीय खतखते चांगलेच तिखट बनणार अशी चिन्हे दिसत आहेत.
25 जणांचे संख्याबळ घेऊन भाजपचे आघाडी सरकार मजबूत अवस्थेत असताना भाजपने काँग्रेस पक्षात विभाजन पाडून त्यातील 11 पैकी 8 जणांना थेट प्रवेश दिल्याने भाजपमध्ये आता कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. त्याचबरोबर एवढे दिवस ज्या नेत्यांविरोधात भाजपचे नेते, पदाधिकारी, मंत्री दंड थोपटून उभे होते तेच नेते आता मांडीला मांडी लावून बसणार असल्याने तडजोडीची परिसीमा गाठावी लागणार आहे.
लोबो, कामत, सिक्वेरांना मंत्रीपद?
मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. मायकल लोबो यांना मंत्रीपद मिळाले तर डिलायला लोबो यांना नेमकी कोणती खाती द्यायची? दिगंबर कामत हे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना आता मंत्रिमंडळात द्वितीय स्थान द्यावे लागणार आहे. त्यांना देखील काही महत्त्वाची खाती द्यावी लागणार आहेत.
कोणा तिघांना वगळणार
या तीन मंत्र्यांना समाविष्ट करून घेणार असाल तर मंत्रिमंडळात फेरबदल हे करावे लागणार आहेत. नेमक्या कोणत्या मंत्र्यांवर कारवाई करणार? कोणा तिघा मंत्र्यांना हटविणार ? हा प्रश्न आलाच. 8 जणांच्या समावेशाने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना जबरदस्त हादरा बसलेला आहे. अनेकांचा आताशा आपापल्या खात्यावर चांगला जम बसलेला होता. मात्र 8 जणांचा समावेश केल्यानंतर तिघांना मंत्रिमंडळात समाविष्ट करणे अपरिहार्य आहे. मंत्रिमंडळातून नेमके कोणाला अर्धचंद्र देणार ? या वरून मंत्रिमंडळातील अनेक मंत्री एकमेकांच्या संपर्कात आले व चिंता व्यक्त सुरु झाली.
गावडे, नाईक, हळर्णकरना हटविणार?
प्राप्त महितीनुसार गोविंद गावडे, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर या तीन मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. वास्तविक सुदिन ढवळीकर यांना बाजूला सारण्याचे प्रयत्न होते, कारण ते भाजपचे नाहीत. परंतु, लोकसभा निवडणुकीत त्यांची मदत आवश्यक असल्याने यावेळी सुदिन ढवळीकर यांना भाजप मुळीच हात लावणार नाही तसे आश्वासन अलिकडेच त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहे. प्रश्न आहे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा. दिगंबर कामत यांच्यासाठी व मायकल लोबो यांच्यासाठी दोघांना तडजोड करावी लागणार आहे. मात्र प्रत्येक मंत्री बुधवारच्या या घटनेने अस्वस्थ झालेले दिसले.
मंत्री विश्वजित राणे कमालीचे अस्वस्थ
नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे हे कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. त्यांच्याकडील महत्त्वाची दोन खाती जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे थोडय़ाच दिवसांमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल घडवितील तसेच खांदेपालटही करणार आहेत. सर्वांची खाती काढून घेऊन नंतर नव्याने त्याचे वाटप करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. हा निर्णय नेमका कधी होणार हे समजलेले नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची धास्ती अनेकांनी घेतली आहे.
सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार काही मंत्री एकमेकांच्या संपर्कात आले व त्यांच्यामध्ये बातचीत सुरु झाली. पेंद्रात भाजपचे सरकार असल्याने कोणालाही बंड पुकारण्याचा धीर होणार नाही एवढेच, अन्यथा अस्वस्थता कमालीची निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना आता 28 ही आमदारांची संयुक्त बैठक बोलवावी लागणार आहे. ती लवकरच होईल असे दिसते. नवी दिल्लीत ‘आप’च्या सरकारला एवढे मजबूत समर्थन मिळाले तेवढेच किंबहूना त्याही पेक्षा समर्थन आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या बाजूला आहे. या सरकारकडे 85 टक्के आमदारांचे समर्थन लाभले आहे. गोव्याच्या इतिहासात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात समर्थन आजवर कोणत्याही सरकारला लाभले नाही.