कावरेतील लोकांची पंतप्रधानांकडे तक्रार
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील ’हर घर जल’ योजनेचे सुकलेले नळ आता पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढणारी तक्रार केपे तालुक्यातील कावरे येथील नागरिकांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
या वाडय़ावरील एकाही घराला नळाची जोडणीच नसताना मुख्यमंत्री 100 टक्के लोकांना पाणीपुरवठा केल्याचा दावा कोणत्या आधारावर करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 19 ऑगस्ट रोजी सरकारने गोव्याला 100 टक्के ’हर घर जल’ देणारे देशातील पहिले राज्य म्हणून घोषित केले. मात्र असे करून सरकारने मोठी घाई केली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पाण्यासाठी करावी लागते वणवण
एका कावरेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास गावकरवाडा येथील लोकांना आजही पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील जलस्रोत त्यासाठी अपुरे पडत आहेत. गावात केवळ दोन विहिरी असून त्यातून मिळणारे अत्यल्प पाणी लोकांच्या रोजच्या गरजा भागवू शकत नाहीत. उन्हाळ्यात तर काही महिने या विहिरी पूर्णतः आटतात. त्यामुळे गावातील महिलांना मोठी पायपीट करून अन्य ठिकाणाहून पिण्याचे पाणी मिळवावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घालावे, असे आवाहन या तक्रारपत्रातून करण्यात आले असून वाडय़ावरील सर्व 49 घरांमधील कुटुंबप्रमुखाच्या सहीने ते पाठविण्यात आले आहे.
या तक्रारीच्या प्रती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, साबांखा मंत्री नीलेश काब्राल, तसेच साबांखा साहाय्यक अभियंता यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.