जनजागृतीकडे दुर्लक्ष : नदीकाठांवर निर्माल्याचे ढीग : पीओपी गणेशमूर्ती विसर्जनास बंदी
बेळगाव : पीओपी गणेशमूर्तींचे नद्यांमध्ये विसर्जन केल्याने त्यामधील विषारी घटकांपासून जलचर प्राण्यांना धोका निर्माण होत असल्याचे सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पीओपी गणेशमूर्तीच्या निर्मितीवर व विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र उत्सव काळात नदी-नाल्यांमध्ये निर्माल्यासह इतर वस्तू टाकल्या जात आहेत. यामुळे नद्या दूषित बनत आहेत. यावर लगाम लावून जनजागृती करण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण असून अडचण नसून खोळंबा अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. पीओपी गणेशमूर्तींचे नदी-नाल्यांमध्ये विसर्जन करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.या संदर्भातील आदेश उत्सवाच्या तोंडावर जारी करण्यात आला आहे.
यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यतत्परता दिसून येते. सध्या उत्सव काळात नदी-नाल्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकले जात आहे. याबरोबरच इतर वस्तूही टाकल्या जात आहेत. यामुळेही पाण्याचे प्रदूषण होत आहे. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, प्लास्टिक पोती पाण्यामध्ये टाकली जात आहेत. यामुळे पाण्याच्या प्रदुषणाबरोबरच नदीकाठावरील शेतकऱ्यांना या कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतवडीमध्ये कचरा इतर टाकाऊ वस्तू विखरुल्या जात असल्याने शेती व्यवसायालाही याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्सव काळात नदी-नाल्यांमध्ये निर्माल्य टाकण्यात येऊ नये, यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र अशी कोणतीच कृती या मंडळाकडून हाती घेतली जात नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्कंडेय नदीच्या काठावर असणाऱ्या पुलांशेजारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निर्माल्यासह इतर वस्तू टाकल्या जात आहेत. ग्रा. पं. कडून अनेकवेळा जनजागृती करून कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. मात्र नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे नदीवरील पुलांशेजारी निर्माल्याचे ढीग पडत आहेत. एकीकडे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केले जात असले तरी नागरिकांकडून नदी-नाल्यांमध्ये निर्माल्य टाकून परिसर अस्वच्छ बनविला जात आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सूज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.