आव्हान देणाऱया याचिकांवरील सुनावणीसाठी नवीन 5 न्यायाधीश नेमणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुस्लिमांमधील बहुपत्नीत्व आणि ‘निकाह हलाला’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱया याचिकांवर सुनावणी करण्यासाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. या मुद्दय़ावर जनहित याचिका दाखल करणाऱया वकील अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठाला नवीन खंडपीठ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याची विनंती केली. या प्रकरणात, पूर्वीच्या घटनापीठातील न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता हे दोघे निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालय नवीन पाच न्यायाधीशांची नियुक्त करणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2018 मध्ये हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवले होते.
मागील घटनापीठाने 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांना जनहित याचिकांमध्ये पक्षकार केले होते आणि त्यांचे उत्तर मागितले होते. न्यायमूर्ती बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील तत्कालीन घटनापीठात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश होता. यापैकी न्यायमूर्ती बॅनर्जी आणि न्यायमूर्ती गुप्ता यावषी अनुक्रमे 23 सप्टेंबर आणि 16 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले. आता बहुपत्नीत्व आणि ‘निकाह हलाला’ या प्रथांविरोधातील आठ याचिकांवर सुनावणी करण्यासाठी घटनापीठाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे.