उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
प्रतिनिधी/कोल्हापूर
पॉलिटेक्निक अंतिम वर्षाचा निकाल 37 टक्के लागल्याने पुर्नपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेत व्यवसायाभिमुक शिक्षण दिले जाईल. त्यामुळे पॉलिटेक्निकचा संपुर्ण अभ्यासक्रम मराठीत करण्याच्या सुचना संबंधीत शाक्षण विभागाला दिल्या आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
शिवाजी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विकास मंचचे राज्याध्यक्ष एन. डी. पाटील होते.
मंत्री पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विदेशाचे नेतृत्व करणारी पिढी निर्माण केली जाईल. कारण व्यवसायाभिमुख धोरणाला भारतीयत्वाचा आत्मा जोडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराची संधी मिळेल. त्यासाठी शिक्षण तज्ञांनी आपले चिंतन प्रस्तावाच्या स्वरूपात सरकारला कळवावे. तसेच उपस्थितांच्या प्रश्नाला उत्तर देताना भविष्यातील विद्यापीठाचा बृहत आराखडय़ासंदर्भात कडक भुमिका घेतली जाईल. यासह अन्य शैक्षणिक मुद्दय़ांवर चर्चा केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना एन. डी. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून विद्यार्थी विकास करण्याची तुम्हाला मोठी संधी आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू करताना संस्थाचालकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर उपाय योजना कराव्या. प्राध्यापक भरती त्वरीत करावी, शिक्षणसंस्थांचे लाईटबील व महापालिका क्षेत्रातील संस्थांचे टॅक्स कमी करावा. संजय परमने यांच्या ‘कार्यवृतांत’ पुस्तिकीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अधिसभा सदस्य पंकज मेहता यांनी स्वागत व आभार मानले. डॉ. राहूल माने यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यमान परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे, डॉ. वासंती रासम, अभिजित पाटील, डॉ. एन. बी. गायकवाड, विशाल गायकवाड, आदी उपस्थित होते.
विद्यापीठ निवडणुका समन्वयाने लढवा
राज्य सरकारमध्ये जो जागेवरून गोंधळ झाला, तो गोंधळ विद्यापीठ निवडणुकांमध्ये टाळण्यासाठी विद्यापीठ विकास मंचने समन्वय साधावा. विद्यापीठावर सत्ता येण्यासाठी एकटय़ाने किंवा युती करा परंतू नोंदणीकृत पदवीधर मतदारांना वारंवार संपर्क साधा, मतदानावेळी त्यांना घेवून येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करा. निवडणुकीत मेहनत घेण्याची तयारी ठेवली तर यश निश्चित मिळेल. यासंदर्भात भविष्यात स्वतंत्र नियोजन बैठक घेवून विद्यापीठ निवडणुकीची आखणी करुया.
इच्छाशक्ती नसल्याने अनेक फायली पेंडींग
महाविकास आघाडी सरकारची इच्छाशक्ती नसल्याने गेल्या अडीच वर्षात मराठा, धनगरांसह अन्य समाजाची आरक्षण, शेती तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक निर्णय पेंडींग आहेत. माझ्या टेबलवर फाईली आल्या की डोके गरगरते. तसेच अनेक चुकीचे निर्णय घेतलेले असल्याने ते रद्द करावे लागतात. परंतू भविष्यात जास्तीत जास्त समाजाभिमुख व विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जातील.
विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून
विद्यापीठ विकास आघडीत शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तळागाळातील प्रश्न समजण्यास मला मदत होणार आहे. त्यामुळे आता वेळ न घालवता विद्यार्थी हिताचे प्रश्न माझ्यासमोर घेवून या, आपण त्वरीत निर्णय घेवून त्यांना न्याय देवूया.