गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका : पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार
प्रतिनिधी/मडगाव
गोव्यातील उद्योग चढय़ा दराने वीज खरेदी करत असूनही त्यांना होणारा वीजपुरवठा निकृष्ट दर्जाचा असणे ही धक्कादायक बाब असून गोव्यातील उद्योगांना सतावणाऱया या समस्येवर आपण या विधानसभेच्या आता येणाऱया पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यातील उद्योगांप्रती सरकारने हीच अनास्था दाखविली, तर एकेक करून गोव्यातील उद्योग इतर राज्यांत जातील आणि त्याचा विपरित परिणाम गोव्यातील रोजगारावर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
गोव्यातील उद्योगांना व्यवस्थित वीजपुरवठा होत नसल्याने त्यांच्या उत्पादनावर परिणाम तर होतोच त्याशिवाय यंत्रसामग्री बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सरकार खुल्या बाजारातून वीज विकत घेत आहे. मात्र ही वीज विकणाऱया कंपन्यांना निकृष्ट पुरवठा केल्यास जो दंड आकारायचा असतो त्याची तरतूद या व्यवहारात नाही. त्याचेच विपरित परिणाम सध्या राज्यातील उद्योगांना सोसावे लागत आहेत, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
ही गंभीर समस्या असून हजारोंच्या रोजगाराशी तिचा संबंध आहे. सरकार त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारची उद्योगांप्रती हीच अनास्था असेल, तर भविष्यात गोव्यात नवीन उद्योग येणेही कठीण होईल, असे सांगून सरदेसाई यांनी त्यामुळेच गोवा फॉरवर्डने या समस्येची गंभीरपणे दखल घेतली आहे, असे म्हटले आहे. या समस्येचे बळी ठरलेल्या उद्योजकांनी गोवा फॉरवर्डकडे त्यांच्या समस्या मांडाव्यात आणि आवश्यक त्या सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनात यावर आवाज उठवून गोव्यातील उद्योजकांची ही समस्या दूर करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करेन, असे आश्वासन सरदेसाई यांनी दिले आहे.