योगी आदित्यनाथ यांचे गुजरातच्या मतदारांना आवाहन
उत्तर प्रदेशमधील मतदारांनी गेल्या मार्च मधील विधानसभा निवडणुकीत काँगेसची जशी दशा केली तशी गुजरातच्या जनतेने या विधानसभा निवडणुकीत करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मतदारांना काँग्रेसला धडा शिकवून राज्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करा, अशी साद घातली आहे.
गुजरातमधील आणंद जिल्हय़ातील खांबात मतदारसंघात ते भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना भाषण करीत होते. गुजरात काँगेसमुक्त झाला तर या राज्याच्या सर्व समस्या सुटतील. काँगेस आणि आम आदमी पक्ष हे दोन्ही पक्ष देशाच्या सुरक्षेला धोका आहेत आणि विकासाच्या मार्गातील अडथळे आहेत. ते लवकरात लवकर दूर होण्याची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी या दोन्ही पक्षांचा मुळीच थारा न देता झिडकारले आहे. याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
काँगेस संपणे ही गांधींचीही इच्छा
गुजरातमध्येच जन्माला आलेले महात्मा गांधी यांनी फार पूर्वीच काँगेस संपुष्टात आणा, असा संदेश दिला होता. कारण त्यांना भविष्यात काँगेसचे काय होणार आहे, याची कल्पना आली असावी. आता गांधींच्या गुजरातमधील जनतेते हे उत्तरदायित्व आपल्याकडे घ्यावे. त्यांनी काँगेसला जन्मभर लक्षात राहील असा धडा देण्याची आवश्यकता आहे. या निवडणुकीने त्यांना तशी संधी प्राप्त करुन दिली आहे. ती त्यांनी घ्यावी आणि काँगेसला घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सोमनाथच्या मार्गात अडथळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्वरित गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराच्य्या पुनर्बांधणीची इच्छा सरदार पटेल यांनी व्यक्त केली होती. मात्र, काँगेसने या मंदिराच्या निर्माण कार्यात अडथळे आणले. काही विशिष्ट समाजघटकांची मते काँग्रेसला देशाचा इतिहास आणि संस्कृतीहीपेक्षाही मोठी वाटतात, अशी टीका त्यांनी केली.