नीलिमा बोरवणकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /बेळगाव
प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ, प्रसंग हे येतच असतात. परंतु आपण त्यातून बाहेर पडण्यापेक्षा हे माझ्याच नशिबी का? माझ्याच वाटय़ाला का? या प्रश्नांमध्ये गुरफटत बसतो. दुःखाला कवटाळत बसण्यापेक्षा जीवनात सकारात्मकता ठेवा. जो आपल्यापेक्षा दुःखी आहे, त्याचा विचार करून आपण त्याहून सुखी आहोत यात समाधान माना, असे उद्गार पुणे येथील नीलिमा बोरवणकर यांनी काढले.
वसंत व्याख्यानमाला सोसायटीच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत रविवारी 5 वे पुष्प पुणे येथील नीलिमा बोरवणकर यांनी गुंफले. त्यांनी ‘सकारात्मकता पेरणारी माणसे’ या विषयावर मार्गदर्शन करत आपल्याला आलेले अनुभव कथन केले. व्यासपीठावर सोसायटीच्या अध्यक्षा प्रा. मीना खानोलकर, उपाध्यक्षा प्रा. स्वरुपा ईनामदार, दीपा देशपांडे उपस्थित होत्या.
आयुष्य खूप सुंदर आहे, त्यामुळे त्यावर प्रेम करत जीवन जगत रहा. ज्याच्याजवळ सर्वकाही आहे, त्याचा हव्यास संपलेला नाही परंतु त्याच्याजवळ काहीच नाही, तो मात्र प्रत्येक क्षण आनंदात घालवत आयुष्य जगत आहे, असे चित्र समाजात दिसते, असे सांगत बोरवणकर यांनी आपण लेखन करत असताना नवनवीन लोक कसे भेटत गेले व त्यातून सकारात्मक ऊर्जा देणारी माणसे कशी भेटत गेली याची त्यांनी माहिती दिली.
प्रा. मीना खानोलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दीपा देशपांडे यांनी परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते धनश्री नाईक, सुमन रानडे, हिमांगी प्रभू, दीपा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. वक्तृत्त्व स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सूत्रसंचालन शिल्पा लांडगे यांनी केले. अध्यक्षीय समारोप मीना खानोलकर यांनी केला. सुमन रानडे यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले.