गायरान अतिक्रमणप्रश्नी वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई देण्यास सज्ज : माजी आमदार चंद्रदीप नरके यांची पत्रकार परिषदेत माहिती
वाकरे/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणप्रश्नी आपण गेल्या बुधवारी मुंबईत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती केली असून योग्य निर्णय न झाल्यास वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई देण्यासाठी सज्ज आहोत अशी स्पष्ट भूमिका करवीरचे माजी आमदार आणि कुंभी कासारीचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत मांडली.
याबाबत अधिक माहिती देताना नरके म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अतिक्रमण काढल्यास राज्यातील लाखो लोक बेघर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष पसरेल अशी भूमिका मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडली आहे. गेल्या अनेक वर्षात राज्यातील अनेक ग्रामपंचायतीनी गावठाण वाढविस्तार आराखडा सादर केला. त्याचबरोबर गावठाण आणि गायरानातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी अनेक वेळा प्रस्ताव दिले आहेत.ग्रामीण भागात घरबांधणीसाठी जागा नसल्याने गायरानात घरे बांधण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. मात्र शासनस्तरावर याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर शासनस्तरावर ग्रामपंचायतींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.लोकसंख्या वाढ झाल्याने जनतेला जागा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र याबाबत यापूर्वीच्या कोणत्याही शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लोकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे.
याबाबत शासनाने उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका किंवा सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करावे, त्याचबरोबर या प्रश्नासंदर्भात अभ्यास गट तयार करून ही अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक घेऊन अध्यादेश काढावा अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. याबाबत ग्रामीण भागातील अतिक्रमण केलेल्या जनतेने घाबरून जाऊ नये,याबाबत योग्य तो मार्ग निघेल. शासनदरबारी प्रयत्न करून या निर्णयावर स्थगिती घेऊ असेही नरके म्हणाले. या पत्रकार बैठकीला व्हाईस चेअरमन निवास वातकर,सर्व संचालक उपस्थित होते.