तालुका कृषी अधिकारी यांनी केला पंचनामा
करमाळा प्रतिनिधी
वरकटणे तालुका करमाळा येथील रवींद्र दत्तात्रय देवकर या शेतकऱ्यांनी परंडा येथील स्वामी समर्थ कृषी केंद्र या सेवा केंद्रातून पोटॅश खताची खरेदी केली होती. मात्र हे खत वापरल्यानंतर पीक करपली अशी तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टलवर या शेतकऱ्यांनी तक्रार केली.
यानंतर पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत कृषी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले. जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, पंचायत समिती कृषी अधिकारी शंकर मिरगणे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या घरी जाऊन शिल्लक असलेल्या 15 पोत्याचा पंचनामा केला व खताचा नमुना काढून तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठवला आहे.
एप्रिल 2022 मध्ये परंडा भागात स्वस्त दरात पोटॅश खत मिळते, म्हणून सौंदे, आळसुंदे, वरकटणे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोटॅश खत आणली होती. मात्र हे खत बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी हे खत व्यापाऱ्यांना परत देऊन आपले पैसे परत आणले. मात्र रवींद्र देवकर या शेतकऱ्यांनी या खताचा वापर केला. या वापरानंतर माझी केळीचे झाडे करपली असा आरोप त्यांनी केला आहे.
मात्र या शेतकऱ्याकडे खत खरेदीची कोणतीही बिल नाही किंवा संबंधित दुकानदाराकडून खत खरेदी केला याचा पुरावा नाही. मात्र त्यांनी आपण स्वामी समर्थ कृषी केंद्र परांडा या दुकानातून खत खरेदी केल्याचा आरोप केला आहे.