पावसाची उघडीप, शेतकरी शेतीकामात मग्न : उत्पादनात घट होत असल्याच्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा पुन्हा एकदा शेतीकामाकडे वळला आहे. विशेषतः चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, मण्णिकेरी आदी भागात बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. अतिपावसामुळे बटाटा पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आधीच लागवडीत उच्चांकी घट झाली आहे. त्यातच पावसामुळे बटाटा कुजल्याने उत्पादनात घट होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
तालुक्मयातील कुदेमनी, कल्लेहोळ, बसुर्ते, बिजगर्णी, बेळवट्टी, बेळगुंदी, बाकनूर, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, कुरिहाळ, मण्णिकेरी, केदनूर, कडोली, बंबरगा, देवगिरी, गुंजेनहट्टी, हलगा, बस्तवाड, मारिहाळ, कोंडुसकोप आदी भागात बटाटय़ाची लागवड झाली आहे. मात्र अतिपावसामुळे काही भागातील बटाटा पिकाला फटका बसला आहे. तर काही ठिकाणी बटाटा पीक कुजून खराब झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार, अशी चिंता उत्पादकांना लागली आहे.
उघडीप कायम राहिल्यास काढणीला वेग
बटाटय़ाचे म्हणावे तसे उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱयांनी लागवड कमी केली आहे. त्यामुळे बाजारात देखील परराज्यातील बटाटा दिसून येत आहे. सध्या तालुक्मयातील हंदिगनूर भागात तुरळक प्रमाणात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र पावसाची उघडीप कायम राहिल्यास येत्या चार दिवसांत बटाटा काढणीला वेग येणार आहे.
रताळी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
बटाटा काढणीबरोबर पिकातील तण काढण्याच्या कामात देखील शेतकरी दंग असल्याचे दिसत आहे. त्याबरोबर रताळी, भुईमूग काढणीला देखील येत्या काही दिवसात प्रारंभ होणार आहे. यंदा बटाटय़ाच्या तुलनेत रताळी लागवडीचे प्रमाण वाढले आहे. साहाजिकच यंदा रताळी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने भातपीक जोमाने आले आहे. आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने भात शिवार डोलू लागले आहे. बहुतांश ठिकाणी पोसवणीला देखील प्रारंभ झाला आहे.