अक्कलकोट : प्रतिनिधी.
कुरनूर धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच असून सोमवारी हा विसर्ग वाढवून २ हजार क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे आता बोरी नदीकाठच्या शेतीत पाणी शिरण्याची शक्यता असून बोरी नदीवरील रस्तेही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असून पाटबंधारे विभागाशी ते सातत्याने संपर्कात आहेत. सध्या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल १ हजार ६५० क्युसेकचा विसर्ग होता. सकाळपासून धरणात येणाऱ्या पाण्याची विसर्ग वाढल्याने ३५० क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे सध्या पुराचा जरी धोका नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व मंडल अधिकारी, तलाठी आणि प्रशासनाशी संबंधित कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार सिरसट यांनी दिली आहे. याबाबत उद्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रकाश बाबा यांच्यासह अन्य अधिकारी कुरनूर धरणाला भेट देणार आहेत. यावेळी धरणाचा पाणीसाठा आणि संभाव्य पूरस्थितीच्या नियोजन यावर चर्चा देखील केली जाणार आहे,अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.