कलाकार-कारागीरांना महाविद्यालयात शिकवण्याची संधी : ‘युजीसी’कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत, कलाकार आणि कारागीरांना महाविद्यालयात शिकवण्याची संधी दिली जाईल. कुंभारकाम, बांबू कला, सूत कताई, लाकूडकाम, चरखा चालवणे, कापडावर छपाई, सेंद्रिय कापड रंगविणे, हस्त भरतकाम, गालिचे बनविणाऱ्यांपासून गायक, नर्तक यांनाही महाविद्यालयांमध्ये ‘प्राध्यापक’ होता येणार आहे. यासंबंधी युजीसीने अधिकृत नोटीस जारी करून माहिती दिली आहे. एनईपी-2020 मध्ये उच्च शिक्षण आणि कला यांच्यातील अंतर कमी करण्यावर भर देण्यात आला असून त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (‘युजीसी’) स्थानिक कलाकार/कारागीरांना महाविद्यालयांमध्ये निवासी कलाकार म्हणून नियुक्त करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या मसुद्यानुसार कलाकार आणि कारागीरांची उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाईल. सदर कारागीर कॉलेजमध्ये वर्ग घेतील. पण, हे वर्ग नियमित असणार नाहीत. ते व्याख्याने, कार्यशाळा, प्रॅक्टिकल आणि प्रशिक्षण घेतील. विविध पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर आणि निवड झाल्यानंतर महाविद्यालयीन निवड समिती त्यांना तीन वर्षांसाठी नियुक्त करेल. या उपक्रमामुळे स्थानिक कलाकार आणि कारागिरांना पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, केंद्र किंवा राज्य शासनाचे पुरस्कार मिळविलेल्या आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या कलाकार आणि कारागिरांना महाविद्यालयात अध्यापनाची संधी दिली जाईल. कला, हस्तकला, नृत्य, संगीत, ललित कला यासह अनेक क्षेत्रातील तज्ञ ‘कला गुरु’साठी अर्ज करू शकतील.
त्रिस्तरीय पातळीवर भरती होणार…
- गुरु : या पदावरील ‘प्राध्यापक’ कलाकार आणि कारागीर असतील. त्यांच्याकडे किमान पाच वर्षांचा अनुभव असावा आणि त्यांना आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले असावेत.
- परम गुऊ : असाधारण कलाकार आणि कारागीर यांना ‘परम गुरु’ स्तरावर स्थान दिले जाईल. यामध्ये कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव असावा. तसेच त्यांना उल्लेखनीय कार्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून पुरस्कार मिळालेला असावा.
- परमेष्ठी गुऊ : या पदावरील व्यक्ती नामवंत कलाकार आणि कारागीर असेल. या पदासाठी आपल्या क्षेत्रातील किमान 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.