अध्याय पंचविसावा
स्वधर्म म्हणजे ईश्वरी इच्छेनुसार आपल्या वाटय़ाला आलेले काम होय. त्याचे महत्त्व सांगताना भगवंत म्हणाले, उद्धवा! स्वधर्मवृत्तीने भक्ती प्रगट होते, ती खरोखर सात्त्विक वृत्ती होय. समजा स्वकर्म करताना फलाची आशा जर वाढत गेली, तर मिळालेले फळ बाधक होते आणि ते न केले तर नरक भोगावा लागतो. अशा रीतीने ह्या संसारामध्ये कर्मानेच लोक बद्ध केले आहेत. जो जीव स्वतंत्र होता, तो कर्मानेच परतंत्र केला आहे. वास्तविक पाहता माणसांनी त्यांच्या वाटय़ाला आलेले कर्म त्यांच्या पूर्वजन्मीच्या कृत्यानुसार प्राप्त झाले आहे हे ओळखून ते कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण करणे त्यांच्याच हिताचे आहे हे लक्षात घ्यायला हवं! कारण असं बघ, जर ते करत असलेल्या कर्मातून त्यांनी अपेक्षा ठेवल्या की, त्यातून पाप किंवा पुण्य तयार होते. असं घडू नये म्हणून कर्मच करायचे टाळले तर नरकात जावे लागते. थोडक्मयात इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थती निर्माण होते. अपेक्षा ठेऊन कर्म करावे तरी पंचाईत, न करावे तरी पंचाईत! मग यातून मार्ग काढायचा कसा असा विचार करशील तर लक्षात येईल की, येथे सद्गुरू मदतीला धावून येतात. येथे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. ज्याप्रमाणे सर्पदंशाचे संकट मंत्रवादी किंवा गारुडी निवारण करतो, त्याप्रमाणे कर्मामध्येच उत्पन्न झालेली कर्माची बाधा गुरुराज तत्काळ नष्ट करतो.
सद्गुरूला शरण गेले असता, आपले हित कशात आहे हे ओळखून तो सर्व कर्म आपल्याकडून ब्रह्मार्पण करवतो. असे कर्म ब्रह्मार्पण केले गेले की, त्या कर्मापासून निर्माण होणारी पाप पुण्याची बाधा माणसाला बाधत नाही. त्यामुळे पुनर्जन्मही टळतो आणि कर्म करायचे टाळल्याने वाटय़ाला येणारा नरकवासही चुकतो. आता कर्म ब्रह्मालाच का अर्पण करायचे असे विचारशील तर ब्रह्म हेच कर्माचे प्रकाशक आहे, म्हणून कर्म हे ब्रह्मात्मकच होय. ब्रह्मार्पण केलेले कर्म मलाच अर्पण होते. अशा प्रकारच्या स्वकर्माने स्वाभाविकपणेच जे जे भाविक मला भजतात, ते सर्व शुद्ध सात्त्विक होत असे निःसंशय समज. स्वधर्म हा इतका महत्त्वाचा असताना तो सर्वस्वी निष्फळ आहे असे जे म्हणतात, ते केवळ मूर्ख होत. स्वधर्म हाच चित्तातील मळ नाहीसे करतो आणि सर्व कर्म समूळ नष्ट करतो. स्वधर्माचा एवढा लाभ होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून, जी माणसे विषयाच्या गोडीची इच्छा धरतात, ती बिचारी राजस होत. ती विषयसुखामध्येच केवळ वेडी झालेली असतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यांनी विषयाच्या फळाची इच्छा ठेवल्याने त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी त्यांना देह धारण करणे भाग पडते. त्या देहधारणेमुळे त्या जन्मी जे पाप पुण्य हातून घडते त्यानुसार स्वर्ग, नरक इत्यादि भोग भोगावे लागतात. म्हणून पुन्हा देह धारण करणे ही बाब दुखःदायक आहे. यासाठीच राजस आणि तामस प्रकृती ह्या दुःखदायक आहेत. त्यांच्या दोन्ही प्रकारच्या गुणवृत्ती ऐक. सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझे भजनपूजन करणारा रजोगुणी होय आणि जो शत्रुनाश इत्यादीसाठी माझे पूजन करतो, तो तमोगुणी समजावा. स्वधर्माचे आचरण करून जो नाना प्रकारच्या फळांची इच्छा करितो, त्याला राजस धर्म असे नाव आहे. अंतःकरणामध्ये जो अत्यंत लोभिष्ट असतो, तो जे जे काही कर्मधर्म आचरण करतो, ते ते सर्व लोभिष्टपणाचेच असते. कारण कर्माचे फळ मिळावे असाच त्याचा हेतु असतो. कर्माच्या मूळ स्वरूपात काम्यत्व मुळीच नसते परंतु ते कर्म करत असताना अमुक एक फल ते कर्म केल्यावर मिळावे ही इच्छा, कामना त्या कर्माला काम्य बनविते. उदाहरणच द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की, सोने हे वस्तुतः आपल्या मूळ स्वरूपामध्येच स्थिर असते पण आपण प्रयत्न करून त्याचे दागिने बनवितो. ते बनवण्यासाठी सोनाराला त्यात तांबे मिसळावे लागते. त्यामुळे ते सोने शंभर नंबरी चोख सोने न राहता त्यात तांब्याच्या रूपाने अशुद्धता येते. मुळच्या शुद्ध सोन्याप्रमाणे स्वकर्म हे स्वभावतः पवित्रच आहे. स्वकर्मानं माझे शुद्ध भजन घडते आणि हाच स्वधर्म होय. हे स्वधर्म पालन माणसाला कर्म बंधातून मुक्त करते त्यामुळे त्याचा उद्धार होतो परंतु त्यात इष्टफळाची अपेक्षा केली की, सगळेच मुसळ केरात जाते.
क्रमशः