योगासने-योग साधना निरोगी जीवनासाठी पोषक : योगचा सराव सर्व विकारांना ठेवतो दूर : योगगुरूंचा सल्ला आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. आज जगभरात योगासनांचे आणि योगभ्यासाचे महत्त्व पटले आहे. अनेक देशातील लोक योगाचा सराव करत आहेत. अशावेळी आपण भारतीयांनी केवळ 21 जूनपुरता योग दिन साजरा करून थांबणे योग्य ठरणार नाही. योगासनांचा व योग साधनेचा सराव हा निरोगी जीवनासाठी पोषक आहे. म्हणूनच दररोज त्याचा सराव करायला हवा.
बेळगावमध्ये अनेक योगतज्ञ आणि योग शिकविणाऱया संस्था आहेत. या सर्वांचेच कार्य महत्त्वाचे आहे. त्यापैकीच एक आहेत आरती पडसलगी. 1998 पासून त्या योग साधना करत असून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर योग स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली आहेत. इतकेच नव्हे तर राज्य, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग परीक्षक म्हणूनही त्यांचे काम सुरू आहे.
आरती यांनी योग साधनेमध्ये एमएस्सी, आचार्य योगामध्ये एमए, नॅचरोपॅथी व योगिक सायन्समध्ये डिप्लोमा, योगा स्टडीजमध्ये पीजी तसेच योग प्रवेशिका व पतंजलीची योग शिक्षिका अशा पदव्या घेतल्या आहेत. तत्पूर्वी त्यांचे शिक्षण कला शाखेमध्ये झाले आहे. आरती यांच्या मते आजच्या जीवन शैलीसाठी योग साधना महत्त्वाची ठरणार आहे. आज अनेक व्याधी आणि विकारांनी मनुष्य त्रस्त आहे. संधिवाताचा, उच्च रक्तदाबाचा, मधुमेहाचा त्रास अनेकांना आहे.
हे सर्व विकार होऊ नयेत यासाठी योगाचा सराव आवश्यक आहे. लहानपणापासूनच योगाचा सराव केल्यास या सर्व विकारांना आपल्याला दूर ठेवता येते. त्यांच्या मते योग हा केवळ दैहिक (शारीरिक) हालचाल नाही तर मानसिक, आध्यात्मिक आरोग्यासाठीही तो महत्त्वाचा आहे. साधारण आठव्या वर्षानंतर योगासनांचा सराव करावा, असे त्या सुचवितात. तत्पूर्वी मुलांना योगसाधनेची सक्ती करू नये. कारण त्यांच्या हाडांची बळकटी होण्यासाठी आठ वर्षांचा आलावधी आवश्यक आहे.
अलीकडे गुगल किंवा यू-टय़ुब पाहून योग केला जातो. ते सर्वस्वी चुकीचे आहे. योग साधनेसाठी गुरू अत्यावश्यक आहे. आपली शरीर प्रकृती कशी आहे त्यावर आपल्यासाठी कोणती आसने उपयुक्त आहेत हे फक्त गुरूच सांगू शकतात. त्यामुळे प्रारंभीच्या काळात तरी योगगुरूंच्या सल्ल्यानेच योग करावा, असे त्या सुचवितात.
योगामध्ये राजयोग आणि हट्टयोग असे दोन प्रकार आहेत. राजयोगामध्ये सर्वसामान्य व्यक्ती करू शकते, अशी प्रारंभिक आसने आहेत. हट्टयोगामध्ये शरीराला ताण देऊन खेचणारी (स्ट्रेचिंग) आसने आहेत. यामध्ये गंडभिरुंड, हनुमान आसन असे प्रकार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांच्या मते
केवळ एक दिवस योग दिन साजरा करून फारसे काही साध्य होणार नाही. शाळेमध्ये योग अभ्यास करणे सक्तीचे आहे. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. विचारशक्तीची क्षमता वाढते. यासाठी सर्व शाळांमध्ये योगवर्ग सुरू करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणतात. त्या स्वतः योगतज्ञ तर आहेतच, परंतु जलयोगसुद्धा करतात. विशेष म्हणजे मध्यमवयीन महिलांना सतावणारी पाठदुखी व योग साधनेचा प्रभाव या विषयावर त्यांनी चेन्नईच्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीला प्रबंध सादर केला.