ऑनलाईन टीम/तरुण भारत
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant kishor) यांनी पुन्हा पूर्णवेळ राजकारणात येण्याची घोषणा केली आहे.ते आता इतरांसाठी नाही तर आपल्यासाठी रणनीती बनवणार आहेत. यासाठी प्रशांत किशोर यांनी बिहार राज्य निवडले आहे. ते म्हणाले की, गेल्या १० वर्षांच्या अनुभवानंतर आता ‘रिअल मास्टर’ म्हणजेच जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. याची बिहारपासून सुरुवात. प्रशांत किशोर, मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी याआधी भाजप, तत्कालीन काँग्रेस, जनता दल युनायटेड (JDU), तृणमूल काँग्रेस (TMC) यासह विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून काम केले आहे. (Prashant Kishor may float a political party)
प्रशांत किशोर आता इतरांसाठी रणनीती बनवणार नाहीत, तर नव्या राजकारणाला सुरुवात करणार आहेत. पीके यांनी सोमवारी ट्विट करून जनतेमध्ये जाण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. त्याची सुरुवात बिहारपासून होईल PK यांचा नवा पक्ष केव्हा सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्रशांत किशोर लवकरच देशभरात एकाच वेळी पक्ष सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे पीके अजूनही पाटण्यातच आहे. अशा स्थितीत ते येथे स्वत:साठी नवी रणनीती तयार करत असल्याचे मानले जात आहे.
प्रशांत किशोर यांच्या राजकारणावर राजकीय पक्षांची टीका
प्रशांत किशोर यांनी स्वत:चा राजकीय पक्ष सुरू करण्याचे संकेत दिल्यानंतर भाजप आणि आरजेडीने त्यांच्यावर टीका केली. आरजेडीचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले की, किशोर यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सोबत असणारे संबंध उघड करावेत आणि नंतर राज्यातील सार्वजनिक अस्तित्वाबद्दल बोलावे.
अहमद म्हणाले, जेडीयूने प्रशांत किशोर यांची हकालपट्टी केली होती, तेव्हा नितीश कुमार यांनी बिहारमधील २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाह यांच्या शिफारशीनुसार त्यांचा समावेश केल्याचे सांगितले होते. अमित शहा आणि नितीश कुमार यांच्याशी त्यांचे संबंध समान आहेत की नाही, हे आता त्यांनी स्पष्ट करावे. आतापर्यंत प्रशांत किशोर यांनी या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.