उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाचा आदेश : सात वर्षांनंतर हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून सुटका
प्रतिनिधी / बेळगाव
कुवेंपूनगर येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित प्रवीण सुब्रम्हण्य भट्ट (वय 24) याला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे. त्यामुळे हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहातून तब्बल सात वर्षांनंतर मंगळवार दि. 21 जून रोजी सायंकाळी प्रवीणची सुटका करण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. चिकूबाग, कुवेंपूनगर येथील रिना राकेश मालगत्ती (वय 37), तिचा मुलगा आदित्य (वय 12), मुलगी साहित्या (वय साडेचार वर्षे) या तिघा जणांचा भीषण खून करण्यात आला होता. 16 ऑगस्ट 2015 रोजी पहाटे हा प्रकार घडला होता.
अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे उघडकीस आले होते. रिनाचा खून करताना दोन्ही मुलांनी पाहिल्यामुळे प्रवीणने त्यांनाही संपविले होते. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 16 एप्रिल 2018 रोजी येथील द्वितीय अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने प्रवीण भट्टला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
जिल्हासत्र न्यायालयाच्या या शिक्षेला प्रवीणने उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील न्यायपीठासमोर आव्हान दिले होते. न्यायमूर्ती के. एस. मुदगल, न्यायमूर्ती एम. जी. एस. कमल यांच्या न्यायपीठाने प्रवीण भट्टची निर्दोष मुक्तता केली आहे. 21 जून रोजी न्यायालयाने यासंबंधीचा निकाल दिला आहे. त्याचदिवशी सायंकाळी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली
आहे.
सात वर्षांपूर्वी झालेल्या तिहेरी खुनाच्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त एस. रवी. यांनी चार पथके नियुक्त केली होती.
खळबळजनक खून प्रकरण
रिनावर चाकूहल्ला करून तिचा भीषण खून करण्यात आला होता. आईच्या किंचाळण्याच्या आवाजाने मुलगी साहित्याला जाग आली. तिने आपला भाऊ आदित्यला उठविले. त्यावेळी प्रवीणने तोंड आवळून साहित्याचा बळी घेतला होता. दोरीने गळा आवळून आदित्याचाही खून करण्यात आला होता. साहित्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन ठेवला होता. बादलीत पाणी ओतून त्यात आदित्यला बुडविण्यात आले होते. या खळबळजनक खून प्रकरणातील संशयिताची उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने मुक्तता केली आहे.