वादळी वाऱयासह विजांचा गडगडाट, अनेक ठिकाणी पडल्या गारा
प्रतिनिधी/ सातारा
रखरखत्या उन्हाने हैरान झालेल्या सातारकरांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. कारण सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने साताऱयात दमदार हजेरी लावली होती. मागील महिन्याभरात कडाक्याच्या उकाडय़ाने जमीन चांगलीच तापली होती. त्यातच या अवकाळी पावसाचे आगमन होताच जमिनीतुन मातीचा एकच सुगंध काही काळ सर्वत्र दरवळत होता. विजांच्या गडगडाटासह जिल्हय़ात काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. सातारा शहरासह जावली, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण तालुक्यातही अवकाळीने हजेरी लावत धिंगाणा घातला होता. पावसाने अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती. रात्री उशिरापर्यंत अधुन मधून पाऊस सुरू होता.
हवामान खात्यानेही पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे आता पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडताच राजवाडा, खणआळी, राजपथ आदी ठिकाणी खरेदीकरीता नागरिकांची झालेली गर्दी काही क्षणातच दिसेनाशी झाली. अनेकांनी पावसापासुन आपला बचाव होण्याकरीता सुरक्षित ठिकाणी तास्तांस उभे रहावे लागले होते. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा अधिक प्रमाणात फटका बसला, जे-नागरिक नियमित बसने प्रवास करतात त्यांना गावाकडे जाणारी शेवटीची बस चुकतेय की काय याचीच भीती लागली होती.
सेल्फीची क्रेझ न्यारी
पावसात सेल्फी काढण्याचा मोह काही करता अनेकांना आवरता येत नव्हता, अनेकांकडून तर पावसात भिजुन सेल्फी काढण्यात येत होते. तसेच पावसाबरोबरच विजेचा गडगडाटही तितकाच होता, पण काही पालकांनी आपल्या मुलांना पावसात भिजुन आनंद साजरा करण्याची मुभा दिली होती. त्यामुळे बालचमुंचा एकच कल्ला पहावयास मिळत होता.
अनेकांची उडाली दैना
दुपारी 4 पर्यंत उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. पण अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची चांगलीच दैना उडाली. विशेषतः विविध फेरीवाले विक्रेते, दुकानदार यांनी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या साहित्याची पावसापासुन बचाव कशा प्रकारे करता येईल याकरीता खटाटोप करण्यात येत होता.
विद्युत पुरवठा खंडीत
अवकाळी पाऊस अन् विजेचा लपंडाव हा शुक्रवारी ही पहावयास मिळाला. काही ठिकाणी तर खूप उशिरा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे सातारकरांकडून चांगलीच नाराजी व्यक्त करण्यात येत होती. कारण विजेअभावी अनेकांची कामे खोळंबिली होती. काही मार्गावरील पथदिवे ही बंद होते.
शेतीपिकांचे अधिक प्रमाणात नुकसान
अवकाळी पडलेल्या या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहु सारख्या पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱयांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. त्याचबरोबर बागायतदारांचे तितकेच नुकसान झाले आहे. आंबा, द्राक्ष, कलिंगडसारख्या पिकांवर गारांचा परिणाम झाला आहे. चांगलाच परिणाम झाला आहे.
महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस
महाबळेश्वर ः सायंकाळी सात वाजता महाबळेश्वर व पाचगणी येथे वादळी व गारांसह मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. या अवकाळी पावसाने महाबळेश्वरला अक्षरशः झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच शहरातील वीज गायब झाली. गारांसह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बाजारपेठेत पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. सायंकाळी हवामान ढगाळ झाले होते आणि सात वाजता पावसाने काही काळ थैमान घातले होते.
तसेच लोणंद शहरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने संध्याकाळी सुरुवात केली.