रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मोठे वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संसदेपासून रस्त्यापर्यंत महागाई तसेच बेरोजगारीवरून सुरू असलेल्या राजकीय संग्रामादरम्यान केंद सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. रेल्वेकडून मागील 8 वर्षांमध्ये म्हणजेच 2014 पासून आतापर्यंत 3,50,000 नोकऱया देण्यात आल्या आहेत. तर आणखी दीड लाख नोकऱया उपलब्ध करण्याची तयारी असून याची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय रेल्वेने 2014-2022 दरम्यान आतापर्यंत 3,50,204 जणांना रोजगार दिला आहे. तर आणखी 1.4 जणांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले आहे. वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विचारण्यात आलेल्या पूरक प्रश्नांच्या उत्तरादाखल वैष्णव यांनी देशात लोकांना रोजगार प्रदान करण्यात भारतीय रेल्वेचे प्रमुख योगदान राहिले असल्याचे नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 लाख नोकऱया उपलब्ध करण्याच्या घोषणेच्या हिस्स्याच्या स्वरुपात रेल्वेचे देखील मोठे योगदान आहे. या अंतर्गत 1 लाख 40 हजार नोकऱया प्रदान केल्या जाणार आहेत. चालू वर्षात रेल्वेकडून 18,000 जणांची भरती करण्यात आली असल्याचे वैष्णव म्हणाले.
1.40 लाख नोकऱयांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर ती पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वेकडून मोठमोठय़ा घोषणा करण्याऐवजी वस्तुस्थिती विचारात नियुक्ती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मागील दोन वर्षांदरम्यान 10,189 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. सद्यकाळात 1,59,062 पदांसाठी थेट भरती प्रक्रिया विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. नियमित रिक्त पदे भरण्यासह आउटसोर्सिंग तसेच कंत्राटी यंत्रणांच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देण्यात येत असल्याचे वैष्णव यांनी लेखी उत्तरादाखल सांगितले आहे.