पिंपरी / प्रतिनिधी
कोरोनामुळे गेली दोन वर्षे आषाढी पायीवारीच्या सोहळय़ात खंड पडला असला तरी शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने यंदा पायीवारी होणार, हे जवळपास नाश्चत झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 21 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून पायीवारीमुळे वारकऱयांमध्ये उत्साह आहे. यंदा पालखी सोहळय़ात तिथीची वाढ झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱयांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही-शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
मंगळवार दि. 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. आजोळघरी पालीखीचा मुक्काम असेल. बुधवार दि. 22 व गुरुवार दि. 23 रोजी पुणे, शुक्रवार दि. 24 आणि शनिवार दि. 25 रोजी सासवड, रविवार दि. 26 रोजी जेजुरी, सोमवार दि. 27 रोजी वाल्हे, मंगळवार दि. 28 आणि बुधवार रोजी 29 रोजी लोणंद, गुरुवार दि. 30 रोजी तरडगाव, शुक्रवार दि. 1 आणि शनिवार दि. 2 जुलै रोजी फलटण, रविवार दि. 3 जुलैला बरड, सोमवार दि. 4 रोजी नातेपुते, मंगळवार दि. 5 रोजी माळशिरस, बुधवार दि. 6 रोजी वेळापूर, गुरुवार दि. 7 रोजी भंडिशेगाव, शुक्रवार दि. 8 रोजी वाखरी तर शनिवार दि. 9 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. तर रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळय़ात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळय़ात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंडय़ा नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या 125 ते 150 दिंडय़ा आहेत. सोहळय़ातील या दिंडय़ांना वाहन पास दिले जातील. वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मेपर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नाव आणि मोबाईल क्रमांक संस्थानकडे द्यावेत. यंदा माउलींसोबत सुमारे 5 लाख भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने पालखी तळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता आणि सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असेही ऍड. विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायीदिंडी पालखी सोहळय़ाची नियोजनाची बैठक पालखी सोहळय़ाचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, हभप नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्थ माउली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
बैठकीमध्ये पालखी वेळापत्रकासोबतच विविध विषयांवरही चर्चा झाली. पालखी सोहळय़ातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही, अशी वाहने वारीत सोडू नयेत. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. वाहनांना पास देताना पूर्वी दिंडीकऱयांची अडवणूक होत होती. ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याला सर्व दिंडीप्रमुखांनी टाळय़ांच्या गजरात पाठिंबा दिला.
पालखी मार्गाचे काम सोहळय़ापूर्वी पूर्ण व्हावे
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळय़ापूर्वी पूर्ण व्हावे. सासवड येथील पुलाच्या कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. जेजुरीला नवीन तळासाठी 9 एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तिचा ताबा मिळावा. पालखी सोहळय़ापूर्वी पालखी तळ सुसज्ज व्हावेत. रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दिंडय़ांच्या दुपारच्या जेवणाच्या आणि मुक्कामाच्या जागा बदलल्या आहेत. पोलिसांना याची माहिती नसते. यामुळे ते गाडय़ा लावू देत नाहीत. त्यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी. राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक अखंड असल्याने पालखी सोहळय़ाची वाहने उजवीकडून डावीकडे येण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी नियोजन व्हावे. पालखी महामार्गावरील मद्यपानाची दुकाने रस्त्यापासून 500 ते 700 मीटर अंतर दूरवर असावीत. पालखी तळासाठी 25 एकर जागा आरक्षित ठेवावी. कुंभमेळय़ाच्या धर्तीवर पालखी तळासाठी जागा आरक्षित ठेवावी. माळशिरसला गंगुकाका शिरवळकर यांची समाधी गायब झाली आहे. तर वेळापूरचा धावाच नष्ट झाला आहे. वेळापूर येथील मानाच्या भारुडासाठी जागा उपलब्ध करावी, असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यावर तोडगा काढला जाणार आहे.