अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांचा पुढाकार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी त्यांच्या तयारीला प्रारंभ केला असून काँगेसला वगळून तिसरी आघाडी स्थापन करण्याची योजना आहे. या योजनेसाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेशसिंग यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुढाकार आहे, अशी माहिती देण्यात आली.
एकीकडे सर्व विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र यावे असे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे तिसऱया आघाडीचीही तयारी सुरु झाल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उचावल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ज्या राज्यांमध्ये काँगेस हा एक विरोधी पक्ष आहे तेथील प्रादेशिक पक्ष तिसऱया आघाडीची तयारी करीत आहेत. याच आघाडीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही समाविष्ट व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ममता बॅनर्जींची भेट
अखिलेश यादव यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालला जाऊन त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी ममता बॅनर्जी भाजपशी दोन हात करण्यास सज्ज आहेत, अशी स्पष्टोक्ती केली आहे. त्यांनीही यादव यांच्याशी चर्चा केली. आमचा पक्ष काँगेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांशी अंतर राखून राजकारण करणार आहे. ममता बॅनर्जी या अन्य राज्यांमध्ये जाऊन तेथील बलवान प्रादेशिक पक्षांशी चर्चा करणार आहेत. भाजपविरोधात काँगेसेतर पक्षांनी एकत्र यावे असा आमचा प्रयत्न असेल, अशी भूमिका त्यांनी तृणमूल काँगेसच्या वतीने स्पष्ट केली.
सर्वांना परिवर्तन हवेय
देशातील सर्वांनाच आता परिवर्तन हवे आहे. भाजपने देशाचे जितके नुकसान केले तितके कोणत्याही पक्षाने केलेले नाही. आपल्याला निवडणुकीच्या आधी विरोधक एकवटलेले दिसून येतील. या एकजुटीला आपण आघाडी, गठबंधन किंवा मोर्चा असे काहीही म्हणू शकता, असे प्रतिपादन अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर केले आहे. या दोन्ही पक्षांच्या भूमिकांवरुन, आता भाजपविरोधात आणखी एक आघाडी स्थापन होणार अशी चिन्हे आहेत.
सपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कोलकाता येथे होत आहे. त्यासाठी अखिलेश यादव तेथे पोहचले आहेत. या तीन दिवसांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंबंधीचे धोरण ठरविण्यात येईल, अशी शक्यता आहे. काँगेसला वगळून जी आघाडी होणार आहे, तिच्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हेदेखील समाविष्ट होतील अशी शक्यता आहे. तसेच अन्य प्रदेशिक पक्षांच्या नेत्यांनाही समाविष्ट करुन घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपशी लढा देणार
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी ज्या प्रकारे लढा दिला होता, तसा संपूर्ण देशात दिला जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे प्रयत्न त्या दिशेने होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही, हा आमचा निर्धार असून तो लवकरच दिसून येईल, असेही सपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. काँगेसविरोधी आघाडीत सप, तृणमूल काँगेस, भारत राष्ट्र समिती, द्रमुक, डावे पक्ष आदी पक्षांचा समावेश असू शकतो, अशी चिन्हे दिसत आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आघाडीचे भवितव्य काय
या आघाडीचे भवितव्य काय असेल असा प्रश्नही राजकीय वर्तुळात आता चर्चिला जाऊ लागला आहे. या आघाडीचा प्रभाव किती राज्यांमध्ये किती प्रमाणात होईल, हा महत्वाचा प्रश्न असून त्याचे उत्तर आगामी काही महिन्यांमध्ये मिळू शकणार आहे, असेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.