पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा अंदाज लागत नसला, तरी ही निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सोमवारी पुण्यात दिली.
महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिसंवाद व पुरस्कारार्थींचा सन्मान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सर्वसाधारणतः ज्या पक्षाचे बहुमत असते, त्या पक्षाकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असतो आणि तेच होते. पण, आताची थोडीशी परिस्थिती वेगळी दिसत आहे. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही.
सोलापूर भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात शिंदे यांनी टीका केली.
कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्यात स्त्रियांविषयी दर्जात्मक लिखाण केले आहे. वाटेगाव ते मुंबई हा अण्णांचा प्रवास थक्क करणारा आहे. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ या त्रिसूत्रीचे महाराष्ट्रासाठी योगदान महत्त्वाचे आहे. वैराटांचे झोपडपट्टीधारकांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे.
कुमार सप्तर्षी म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे समाजवादी भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजात एकजूट महत्त्वाची आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजाचे वास्तववादी जीवन मांडले आहे. साहित्यातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे.
हेही वाचा : कदम, अडसूळ यांचीही पक्षातून हकालपट्टी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कारवाई