विषारी दारू प्रकरणाची केंद्राने दखल घ्यावी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकजनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते अन् खासदार चिराग पासवान यांनी बिहारमध्ये विषारी दारूप्राशनानंतर झालेल्या मृत्यूंकरता राज्यातील नितीश कुमार सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करविण्याची मागणी चिराग पासवान यांनी केली आहे. माझे राज्य बिहारला वाचविण्याची विनंती या सभागृहात करत आहे. विषारी दारूमुळे एका मागोमाग एक मृत्यू होत आहेत. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंसाठी राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री, राज्य सरकार आणि प्रशासन विषारी दारूचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात दारूबंदी असतानाही सर्वत्र मद्याची विक्री होत असून महाआघाडीचे नेते याप्रकरणी मौन बाळगून आहेत, कारण त्यांचाच यात सहभाग असल्याचे पासवान यांनी लोकसभेत शून्यप्रहरावेळी म्हटले आहे.