मद्रास उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
मदुराई / वृत्तसंस्था
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्यासाठी मंदिरांमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मंदिरांची शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच लोकांना त्रास होऊ नये यासाठी मोबाईल-फोन ठेवण्यासाठी मंदिरांमध्ये लॉकर बनवावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी करणाऱया याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. मोबाईल फोनमुळे लोकांचे लक्ष विचलित होते आणि मंदिरातील देवतांचे फोटो काढणे हे परंपरेच्या विरोधात असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. छायाचित्रणामुळे मंदिराच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होतो, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर महिलांचे फोटोही त्यांच्या परवानगीशिवाय काढले जात असल्याचा मुद्दाही सुनावणीवेळी उपस्थित करण्यात आला होता.
याचिकाकर्त्याने सुब्रमण्यम स्वामी मंदिर प्रशासनाने मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, आदेश देताना न्यायालयाने तामिळनाडू राज्यातील सर्व मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात पावित्र्य आणि शुद्धता राखली जावी, यासाठी मोबाईल फोनवर बंदी असावी, असे या आदेशात नमूद केल्याने आता राज्यातील इतर मंदिरांमध्ये मोबाईलबंदीची अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच या निकालाचा परिणाम अन्यत्रही होऊ शकतो.
सूचना फलकांकडे केले जाते दुर्लक्ष
अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना दर्शविणारे फलक प्रशासनाकडून मंदिर आवारात चिकटवले जातात. तथापि, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. काही ठिकाणी नियम पाळले जात असले तरी बहुतांश ठिकाणी भाविकांकडून नियम मोडले जातात. अशा परिस्थितीत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दिलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.