केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर लगेच धडक कारवाई : फोंडय़ात आठजणांना तर वास्कोत सातजणांना अटक
प्रतिनिधी /फोंडा, वास्को
केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफआय) वर काल गुरुवारी बंदी घातल्यानंतर गोवा पोलिसांनीही सतर्क होऊन गोव्यातील पीएफआय कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. फोंडा पोलिसांनी आठजणांना तर वास्को पोलिसांनी सातजणांना अटक केली. कोणत्याही गुन्हय़ांत सामील न होण्याची तंबी देऊन नंतर वैयक्तिक जामिनावर त्यांना सोडण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वास्कोचे माजी नगरसेवक सैफुल्ला खान यांचाही समावेश आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली असून दुसऱया बाजूने गेल्या अनेक वर्षांपासून पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी करणाऱया संघटनांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयाचे व कारवाईचे स्वागत केले आहे.
फोंडा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करताना फोंडा तालुक्यातील 8 सदस्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. काल बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएफआयच्या 8 सदस्यांमध्ये मुल्ला अमीन मुझावर (64 हवेली कुर्टी), सादिक हसन मुल्ला (61, नागामशिद कुर्टी), मुल्ला अब्दूल रौफ मुझावर (50, नागामशिद), निसार जकारीया शेख (50, बेतोडा रोड- कुर्टी), मुल्ला महम्मद सय्यद (47, कुर्टी), मुल्ला अब्दूल मुनाफ (50, कुर्टी), मुल्ला अब्दूल करीम (52, कुर्टी), सैउल्लाह सय्यद (35, कुर्टी) अशी त्याची नावे आहेत.
या आठही जणाविरोधात दखलपात्र गुन्हय़ांना प्रतिबंधात्मक कारवाई करताना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.
वास्कोत सात जणांना अटक
वास्कोतील मुस्लीम समूहातील काही नेत्यांना वास्को पोलिसांनी बुधवारी अटक करून नंतर जामिनावर मुक्त केले. वास्को पोलिसांनी या सात जणांना 151 कलमाखाली अटक केल्यानंतर संध्याकाळी त्यांना उपजिल्हाधिकाऱयांसमोर हजर करून वयक्तिक हमीवर मुक्त करण्यात आले. पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.
माजी नगरसेव सैफुल्ला खान यांचाही समावेश
माजी नगरसेवक सैफुल्ला खान तसेच रियाझ कद्री, नियाजी शेख, अमीनुद्दीन मुल्ला, महम्मद साजीद शेख, मुसा शेख, इम्रान शेख अशा एकूण सात जणांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. हे सर्व बायणा, मांगोरहिल व दाबोळीतील रहिवासी आहेत.
वातावरण बिघडू नये म्हणून प्रतिबंधात्मक अटक
अटक करण्यात आलेल्या मुस्लीम नेत्यांनी पीएफआय संघटनेशी आमचा काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांचा या संघटनेशी काही संबंध आहे काय याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. पीएफआय बंदीच्या पार्श्वभूमीवर कुठेही निदर्शने, मोर्चा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा येण्यासारखे पाऊल कुणी उचलू नये यासाठी खबरदारी म्हणून या सात जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आलेली आहे. कोणत्याही अनुचित प्रकारात सहभागी होणार नाही अशी हमी त्यांनी उपजिल्हाधिकाऱयांसमोर दिली आहे.
‘भारत माता की जय’कडून स्वागत-सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या केंद्र सरकारने, देशघातकी आतंकवादी पी.एफ.आय या संघटनेवर घातलेल्या बंदीचे ’भारतमाता की जय संघ, गोवा’ सहर्ष स्वागत करीत आहे, आणि या संघटनेविरुद्ध ‘सर तनसे जुदा’ सारख्या धमक्मयांना भिक न घालता सातत्याने गेली कित्येक वर्षे बुलंद आवाज उठवलेल्या राष्ट्रवादी नागरिक व संघटनांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक तसेच भारत माता की जय संघाचे गोवा राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली आहे.
सीमीचेच कायर्ककर्ते पीएफआयच्या नावाने
गेली 21 वर्षांपासून बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स् ऑफ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सीमी), या संघटनेचे कार्यकर्तेच पीएफआय या नव्या नावाने देशभरात व गोव्यातही सक्रीय झाले होते, हे निदर्शनास आणून देऊनही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने शेवटी या देशद्रोही पी.एफ.आय. वरही बंदी घालण्याची पाळी मोदी सरकारवर आली आहे. या मधल्या हयगयीच्या काळात पी.एफ.आय.ने देशात रक्तपात, ‘सर तन से जुदा’ कारवाया, दंगली, हिजाब सारखी आंदोलने, हिंदू नेत्यांना ठार मारण्यासारखी अनंत कारस्थाने केली, त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी.
पीएफआयची पाळेमुळे आताच खणून काढावी
आताच पी.एफ.आय. संबंधितांची पाळेमुळे खणून न काढल्यास, हे लोक अन्य दुसरे नाव धारण करून ‘सामाजिक कामां’चा मुखवटा चढवतील. त्या बुरख्याआड पुन्हा देशविरोधी कारवाया सुरू करतील हे लक्षात घ्यावे लागेल.
रुमडामळ पंचायतीत पीएफआय कार्यकर्त्यांचा प्रवेश
रुमडामळ पंचायतीत पी.एफ.आय.च्या सक्रीय कार्यकर्त्यांचा दुर्दैवी प्रवेश झाला आहे, त्याची सखोल चौकशी व गंभीर दखल सरकारने घ्यावी असा आमचा आग्रह आहे. ही कीड गोव्याच्या राजकारणात मागील दाराने व राजकीय पाठिंब्याने पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल, असेही वेलिंगकर यांनी सूचविले आहे.
रोहिंग्या, बांगलदेशी घुसखोरांची चौकशी व्हावी
रोहिंग्या व बांगलादेशी हजारोंच्या संख्येने गोव्यात घुसलेले आहेत. त्यांनी मतदानावरही प्रभाव निर्माण केला आहे. त्यामुळेच डिचोली, मडगाव व वास्को येथे झालेल्या जाहीर सभांतून राजकीय नेत्यांनी रोहिंग्याना जाहीर पाठिंबा दर्शवून त्यांना गोव्यात आसरा मिळालाच पाहिजे ही मागणी केली होती. वृत्तपत्रात या बातम्या छापूनही आल्या आहेत. निष्पक्षपणे सरकारने या बाबींची चौकशी करावी.
पी.एफ.आय.ची राजकीय शाखा ‘एस.डी.पी.आय.’ ( सोशालिस्ट डेमोक्राटिक पार्टी ऑफ इंडिया)ची गोव्यातही, फातोर्डा येथे स्थापन झालेली आहे. देशद्रोही कृत्यातही हा पक्ष सामील असल्याचे पुरावे आहेत. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा गोव्यात स्थापनेवेळी जमलेल्या या जमावाने दिल्याचा व्हिडियोक्लिप सामाजिक माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. सरकारने त्यांचीही सखोल चौकशी त्याना ताब्यात घेऊन करावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली आहे.
जिहादी प्रवृत्तींना चपराक : राजहंस
’पीएफआय’वरील बंदी ही ’गझवा-ए-हिंद’ अर्थात भारताला ’इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणाऱया जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे. मुसलमान युवकांचा बुद्धिभेद करून ’पीएफआय’ने देशभरात हिंदू युवतींचे अपहरण करून ’लव्ह जिहाद’, हिंदू नेत्यांच्या हत्या, हिंदूविरोधी दंगली आदींचे षडयंत्र रचत अनेक आतंकवादी कृत्ये केली. वर्ष 2047 मध्ये भारताला ’इस्लामिक स्टेट’ करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी देशहिताच्या ’सीएए’, ’एनआरसी’ या कायद्यांना हिंसक पद्धतीने विरोध केला. एकूणच भारताचे इस्लामीकरण करण्याचे ध्येय बाळगणाऱया या आतंकवादी चळवळीला आज प्रतिबंध बसला आहे, असे सनातन संस्थेचे चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.