शिक्षण प्रणालीला आमच्या संस्कृतीवर द्यावे लागेल लक्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवे. भारतीय शिक्षण प्रणालीने ‘आमच्या संस्कृती’वरही लक्ष देण्याची गरज आहे. जर कुठल्याही मुलाला प्राथमिक शिक्षण त्याच्या मातृभाषेतून देण्यात आल्यास तो ते अधिक चांगल्याप्रकारे समजू शकेल. अन्य भाषेतून शिक्षण देण्यात आल्यास त्या मुलाला प्रथम ती भाषा शिकावी लागणार असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी काढले आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या उद्घाटन सोहळय़ाला त्यांनी संबोधित केले आहे.
मुलांनी प्रथम स्वतःची मातृभाषा शिकायला हवी आणि मग अन्य भाषा शिकण्यात याव्यात. कुणालाही स्वतःच्या भाषांमध्ये प्राविण्य असायला हवे असे नायडू यांनी म्हटले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील दिल्ली विद्यापीठाच्या या समांरभात उपस्थित होते. या सोहळय़ादरम्यान उपराष्ट्रपतींनी 100 रुपयांचे एक विशेष नाणे, एक स्मारक शताब्दी तिकीट आणि एक स्मारक शताब्दी खंडाचे (पुस्तक) प्रकाशन केले आहे. या पुस्तकात विद्यापीठाचा प्रवास सचित्र दर्शविण्यात आला आहे.
स्थानिक भाषांना चालना देण्यात आल्यास विद्यार्थ्यांच्या सृजनात्मकतेला पुढे नेण्यास मदत मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणा स्थानिक भाषेच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे. स्थानिक भाषा विद्यार्थ्यांच्या सृजनात्मकतेला दिशा देण्यास मदत करते असे उद्गार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काढले आहेत.