नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. चार्ल्स यांनी ब्रिटनची सूत्रे राजे या नात्याने हाती घेतल्यापासूनची दोन्ही नेत्यांची ही प्रथमच चर्चा होती. त्यांनी जागतिक मुद्दे आणि द्विपक्षीय संबंध या मुद्दय़ांवर चर्चा केली, अशी माहिती नंतर देण्यात आली आहे.
पर्यावरण संरक्षण, जैव विविधतेचे संरक्षण, ऊर्जा आवश्यकता भागविण्यासाठी कल्पक उपाय आदी मुद्दय़ांचाही त्यांच्या चर्चेत समावेश होता. भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंधांवरही बोलणी झाली. भारताला यावर्षी जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. या अध्यक्षपदाच्या काळात भारत कोणते कार्यक्रम करणार आहे, अध्यक्षस्थानाचा उपयोग जगाच्या हितासाठी कशा प्रकारे केला जाणार आहे, जी-20 नेत्यांच्या भारतात होणाऱया बैठकांमध्ये कोणत्या मुद्दय़ांवर भर दिला जाणार आहे, याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी राजे चार्ल्स यांना दिली.
डिजीटायझेशन कार्यक्रम
डिजिटायझेशन प्रकल्पांच्या क्रियान्वयनात भारत सध्या आघाडीवर आहे. जागतिक पातळीवर भारत या क्षेत्रात कशा प्रकारे कार्य करु इच्छितो, तसेच पर्यावरणस्नेही जीवनशैलीसंबंधी काय केले जाऊ शकते, यासंबंधीही माहिती पंतप्रधान मोदींकडून राजे चार्ल्स यांना देण्यात आली असे नंतर स्पष्ट करण्यात आले.