ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत ही संतांची भूमी आहे. संतांच्या कार्यातून समाजाला नित्य उर्जा मिळते. संत तुकोबाराया हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. त्यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. “भेदाभेद अमंगळ” हा तुकोबारायांचा अभंग देशभक्तीसाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले. ही शिळा ही भक्ती आणि आधाराचे केंद्र आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण केलं. त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांना संबोधित केले. मोदी म्हणाले, सांस्कृतिक मार्गावर आपला देश पुढे चालला आहे. संतांच्या कार्यातून नेहमी ऊर्जा मिळते. जो भंग होत नाही तो ‘अभंग’ असतो. तुकोबांचे अभंग आजही मार्गदर्शक आहेत. तुकोबांचा संदेश सर्वांनी आचरणात आणावा’ पंढरपूरची यात्रा ऊर्जास्रोत आहे. विकास आणि परंपरा या दोन्ही गोष्टींची एकत्र प्रगती झाली पाहिजे. आपणचं आपल्या परंपरांना जपलं पाहिजे.
शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची भूमिका महत्त्वाची आहे. वीर सावरकरांना जेव्हा शिक्षा झाली होती, तेव्हा ते तुकोबारायांचे अभंग गात असतं. वेगवेगळ्या पिढय़ांना तुकोबांचे अभंग प्रेरणा देत राहिले. राष्ट्रीय एकतेला जपण्यासाठी आपणच आपल्या परंपरांना जपलं पाहिजे. सध्या संपूर्ण देशात तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचतीर्थाचा विकास झाला. हे पंचतीर्थ नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. पंढरपुरातील पालखी मार्गाप्रमाणे चारधाम मार्ग, सोमनाथ मंदिर आणि अयोध्येतील राममंदिराचे कामही वेगाने सुरु आहे.
पालखी मार्गासाठी 11 हजार कोटींचा निधी
काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. संत तुकाराम पालखी महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी 350 किलोमीटर असून, त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.