नागरी भरती देखील आयएसआयला सोपविली
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारल्याच्या दोन महिन्यांमध्येच सैन्यासमोर शरणागती पत्करली आहे. शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ला नागरी पदांवरील भरतीचा अधिकार दिला आहे. आता आयएसआय सर्व नागरी पदांवर होणारी भरती, पडताळणी, स्क्रीनिंग तसेच नियुक्ती अन् पदोन्नतीचा निर्णय घेणार आहे. शाहबाज सरकारने पहिल्यांदाच आयएसआयला रितसर कायदेशीर स्वरुपात भरतीची जबाबदारी सोपविली आहे. आयएसआय आतापर्यंत पडद्यामागून अशाप्रकारच्या कार्यांमध्ये भाग घेत होते. या निर्णयानंतर आता शरीफ सरकारच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत. बेनझीर भुट्टो यांच्या पीपीपीचे वरिष्ठ नेते फरतउल्ला बाबर यांनी याप्रकरणी शाहबाज यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी घटक पक्षांना विश्वासात घेतले नाही. आघाडी सरकार चालविण्याची ही योग्य पद्धत नाही असे बाबर यांनी म्हटले आहे. तर जमात उलेमा इस्लामचे मौलाना फजल-उल-रहमान यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.