मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे निर्मात्यांना आवाहन : 13व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
’गोव्यात निसर्ग आहे आणि सरकार सोबत आहे’. त्यामुळे निसर्गसौंदर्याचे वैभव भरभरून लाभलेल्या गोव्यात शुटिंगसाठी चित्रपट निर्मात्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. गोव्यात चित्रपटांसाठी पोषक वातावरण आहे. गोव्यात चित्रपट उद्योग विकसित व्हावा यासाठी गोवा करमणूक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चित्रपट निर्मात्यांना लागणारे सर्व सहकार्य सरकारकडून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित 13व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चित्रपटाच्या प्रिमियर शो ने हा तीन दिवशीय महोत्सव प्रारंभ झाला. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, या महोत्सवाच्या माध्यमातून गोमंतकीयांना दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेता येतो ही खरोखरच प्रशंसनीय बाब आहे. असे सांगितले. यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरलेले सत्कारमूर्ती अशोक सराफ यांच्याबद्दल बोलताना, त्यांनी, अशोक सराफ यांच्यावर गोमंतकीय खरोखरच प्रेम करतात. त्यांचा प्रत्येक चित्रपट आणि टीव्ही वरील कार्यक्रम गोव्यातील जनता घराघरातून आवर्जून पाहतात, असे सांगितले.
गोव्यात आयोजित हेणारा मराठी चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्रात साजरा होणाऱया महोत्सवापेक्षाही सरस आणि दर्जेदार आहे, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कोणत्याही सरकारी पाठिंब्याविना विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तोडीचा आहे, असे सांगून आंचिमच्या माध्यमातून गोव्यात चित्रपट संस्कृती निर्माण करण्याचे आमचे प्रयत्न सातत्याने चालू असून चित्रपट उद्योगाशी संबंधित सर्वांचे सहकार्य मिळाल्यास निश्चितच हा उद्योग अधिक भरभराटीस येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आयनॉक्स चित्रपटगृहात झालेल्या उद्घाटन सोहळ्यास मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, रवी जाधव, मेघना जाधव, संजय जाधव, किशोर कदम, गजेंद्र अहिरे, दिप्ती देवी, उमेश कामत, आदीनाथ कोठारे, जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोती, नेहा पेंडसे, मृण्मई गोडबोले, हेमांगी कवी, सहृत जोशी, शंतनू रोडे, मृण्मई देशपांडे, ]िप्रयदर्शन जाधव, साईली संजीव, सुनिल पाठारे, विराजस कुलकर्णी, शिवाली रंगोळे, गिरीश वानखेडे, तानाजी घाडगे, पार्थ भालेराव, संतोष पाठारे, आदित्य सरपोतदार, ओंकार भावे, केतकी नारायण, मनप्रित प्रेम, रसिका आगाशे, रेशन श्रीवर्धन, वैभव खिर्ती, मंगेश भालेराव, मनाली दीक्षित, भारती दुबे, गायत्री चित्रे, शंकर धोत्रे, मयूर बोरकर, गिरीश मोहिते, प्रशांत पवार, छाया कदम, सुनिल फडतरे, अमेय गोसावी, किशोर कदम, सिद्धार्थ मेनन, शफाक खान आदी चित्रपटश्रृष्टीतील दिग्गज उपस्थित होते.
सुमारे 50 वर्षांपासून मराठी नाटय़-चित्रपटश्रृष्टीच्या माध्यमातून हर प्रकारच्या भूमिका लिलया निभावताना प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महानायक अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. परंतु स्वास्थ्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती निवेदिता जोशी सराफ यांनी पुरस्कार स्वीकारला.
महोत्सव प्रायोजक आयएफबी कंपनीचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध केसकर यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजक विन्सन वर्ल्डचे श्रीपाद शेटय़े यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी चित्रपट क्षेत्रासाठी अतुलनीय योगदान देताना विविध पुरस्कार प्राप्त केलेले अभिनेते, कलाकार, तंत्रज्ञ यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गजेंद्र अहिरे यांच्या स्टोरी टेलर या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. निवेदिता सराफ, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोती आदींनी मनोगत व्यक्त केले. अक्षदा पुराणिक भट यांनी सुत्रसंचालन केले.