ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्यात मविआ सरकार ढासळलं. यांनतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. सत्तांतरानंतर मविआ सरकारमध्ये सुद्धा काँग्रेसकडून (Congress) अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार चांगलं काम करत होतं. परंतु सरकारवर टीका करत राष्ट्रवादी सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादीने जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र तसं न झाल्याचा भाजपला फायदा झाला, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा : रवी राणांना आवरा नाहीतर…; कडू-राणा वादावर मंत्री गुलाबराव पाटलांची फडणवीसांना विनंती
तसेच, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं की, २२ वर्षांनी लोकशाही मार्गाने निवडणूक झाल्याने जी २३ चा हेतू यशस्वी झाला. या निर्णयाला उशीर झाल्याने अनेकांनी पक्ष सोडला त्याची खंत आहे. आम्ही निवडणूक व्हावी तशी मागणी लावून धरली नसती तर कदाचित निवडणुका झाल्या नसत्या. काँग्रेसचे नवे अध्यक्ष चांगले काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.