चंद्रकांत दादांनी देशातील महिलांची माफी मागावी : केंद्रीय तपास यंत्रणांचे हसे झालेय – शिवसेना खा. प्रियांका चतुर्वेदी
सांगली/प्रतिनिधी
शिवसेना हिंदुत्वाच्या नावावर चालते. हिंदुत्वाबरोबर सामाजिक काम करीत महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करीत आहे. यापुढेही सेनेचे हिंदुत्व चालत राहिल, मात्र भाजपकडून हिंदुत्वाचा बुरखा पांघरला आहे. त्याखा खरा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जात असल्याची टीका शिवसेनेच्या राज्यसभेच्या खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. भाजपचे सरकार जिथं नाही, त्याठिकाणी केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांचे नागरिकांत हसे झालंय असेही त्यांनी सांगितले.
सांगली येथे शिवसंपर्क अभियानानिमित्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर खा. चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, दिगंबर जाधव, शंभोराज काटकर, बजरंग पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खा. चतुर्वेदी पुढे म्हणाल्या की, सरकारमध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळून काम करीत आहे. कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, कोणाला घाबरत नाही. आमच्या सरकारचा विचार हिंदुत्ववादी आहे. भाजपचे हिंदुत्ववाद म्हणजे केवळ राजकारण आहे. शिवसेनेचे हिंदुत्ववाद म्हणजे समाजकारण आहे. हिंदुत्ववासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. भाजप केवळ लोकांचे लक्ष विचलित करत आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, देशाची परिस्थिती या सर्वांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. केवळ हिंदुत्ववादाचा मुद्दा उपस्थित करून लक्ष विचलित करत आहे. यांनी फक्त हिंदुत्त्ववादाचा बुरखा पांघरला आहे. परंतू त्यांच्या रक्तात हिंदुत्व नाही.
महाराष्ट्रात काम करणारे सरकार आले आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. आमच्या नेत्यावर ईडीसारख्या चौकश्या लावल्या जातात. केंद्रातील सरकार हे एजन्सीचा वापर करून दबाव टाकत आहे. जिथं भाजपचे सरकार नाही, त्याठिकाणी केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर केला जातो. हे आता सर्वसामान्य नागरिकांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचे नागरिकांत हसे झालंय. परंतू आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात लढत राहू.
भाजपाकडून सतत सरकार पडेल असे बोलले जात होते. मात्र, आमचे सरकार पडणार नाही तर आणखी मजबूत होईल. सरकार पडण्याची प्रत्येक स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. ते सर्व प्रयत्न हे सरकार अपयशी करत आहे. विकासकामात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच अव्वल आहेत. त्यांच्यावर टीका होत असल्या तरी कामाकडे लक्ष देतात. मुख्यमंत्र्यांनी विधवा प्रथे विरोधात ठराव आणला. ही महिलांना सन्मान देणारी शिवसेना आहे. केंद्राकडून जीएसटी देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
संजय राऊत यांचा महाराष्ट्रासाठी मोठा त्याग आहे. त्यामुळे त्यांच्यामागे वेगवेगळ्या चौकश्या लावल्या जात आहे. नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा विरोधात ते आवाजात उठवतात. म्हणून राऊत यांच्यामागे केंद्रीय एजन्सी लावल्या जात आहेत. याशिवाय राज्यसभा सहाव्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे खा. चतुर्वेदी यांनी सांगितले.
चंद्रकांतदादानी देशातील महिलांची माफी मागावी…
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचा आवाज संसदेत उठवितात. भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील महिलांविषयी बोलले ते निंदनीय आहे. भाजपा नेत्यांकडून महिलांबाबत अभद्र भाषा वापरली जाते. हीच भाजपाची मानसिकता आहे. महिला विरोधी भाजपा नेत्यांची विचारसरणी आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणार्यांची मानसिक विकृती दिसून येते. चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःच्या पायावर उभ्या असणार्या देशाच्या प्रत्येक महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केली.