कडोली पंचक्रोशीतील घटना : अल्पवयीन मुलीबरोबर होणारा विवाह रोखला, पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पवयीन मुलीसोबत लग्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गुरुवारी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याची चौकशी केली. यावेळी मुलगी अल्पवयीन आढळल्याने तो विवाह रोखला. वधू व वराच्या अंगाला हळद लागली. मात्र अक्षता पडल्या नाहीत. यामुळे नातेवाईक, पाहुणे मंडळी यांना चांगलाच धक्का बसला आहे. या विवाहाची परिसरात जोरदार चर्चा देखील सुरू झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, की कडोली येथे एक विवाह होत होता. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह होत असताना कोणी तरी मुलीचे वय कमी आहे म्हणून पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. त्यामुळे नातेवाईक मोठय़ा उत्साहात लग्नाच्या तयारीला लागले होते. दुपारी 12 च्या दरम्यान अक्षता होत्या. मात्र अचानक लग्न समारंभस्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. त्यामुळे सारे चकीत झाले.
पोलीस कशासाठी आलेत? याची चौकशी सुरू झाली. त्यावेळी पोलिसांनी वधू-वराच्या वयाबाबतची माहिती मागितली. वधूचे वय कमी आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हा विवाह करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांना विनवणी करण्यात आली. मात्र वय कमी असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला. त्यामुळे हा विवाह रोखण्यात आला.
कडोली येथील या घटनेमुळे साऱयांनाच धक्का बसला आहे. अल्पवयीनांचा विवाह करणे किती धोकादायक आहे, हे आता समजले आहे. एकूणच या विवाहाची जोरदार चर्चा कडोलीसह परिसरात सुरू आहे.
विवाहाच्या खर्चाचा भुर्दंड
विवाह म्हटले आर्थिक खर्च हा ठरलेलाच! वधू-वराच्या कुटुंबालाच नव्हे तर नातेवाईकांना देखील खर्च करावा लागतो. नातेवाईक दूरवरून विवाहासाठी येत असतात तर विवाह करणाऱया कुटुंबाला देखील आयोजन करताना मोठा खर्च करावा लागतो. मात्र अचानक अशाप्रकारे विवाह रोखला तर केलेल्या खर्चाचा भुर्दंड बसून सारेच अंगलट येऊ शकते. तेव्हा या बाबीचाही विचार होणे गरजेचे आहे.
अन् वराला आली भोवळ
पोलीस विवाहस्थळी दाखल झाले. त्यामुळे वधू व वराच्या कुटुंबाला धक्काच बसला. वधू-वराचे वयाबाबतचे दाखले पोलिसांनी तपासले. त्यावेळी वधूचे वय कमी असल्याने हा विवाह करता येणार नाही, असे म्हणत पोलिसांनी वऱहाडींना चांगलेच धारेवर धरले. हा गोंधळ पाहून वराला मात्र भोवळ आली. तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला शुद्धीवर आणण्याचे काम करण्यात आले. वधूला विवाह योग्य होण्यासाठी आणखीन तीन महिन्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे वराला आणखीन तीन महिने वाट पहावी लागणार आहे.
पालकांनी गांभीर्याने घ्यावे
अल्पवयीन मुलाचा किंवा मुलीचा विवाह करणे हा मोठा गुन्हा आहे. विवाह झाला तर वधू-वरासह पालकांनाही शिक्षा होऊ शकते. तेव्हा पालकांनी आपल्या मुलांचा विवाह करताना त्यांचे वय विवाहयोग्य झाले आहे का? याची प्रथम तपासणी करणे महत्त्वाचे आहे. अल्पवयीन वयामध्ये विवाह करणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे. तेंव्हा यापुढे तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.