दोन्ही कृती समितींची होणार संयुक्त बैठक : हद्दवाढ की प्राधिकरण याबाबत जिल्हाधिकऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणार निर्णय
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर शहर हद्दवाढ समर्थक आणि विरोधक या दोन्ही कृती समिती एकाच व्यासपीठावर येवून चर्चा करणार आहेत. एकत्र येवून संघर्ष टाळूया, शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी समन्वयाने तोडगा काढू, अशी भूमीका हद्दवाढ कृती समितीने मांडली होती. त्यास विरोधी समितीने सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या वेळेनुसार लवकरच एकत्र बैठक होईल. हद्दवाढ की प्राधिकरण याबाबत भविष्यात निर्णय घेतला होईल, असे हद्दवाढ विरोधी समितीचे प्रवक्ते नारायण पोवार आणि निमंत्रक राजू माने यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मागील चाळीस वर्षापासून शहराची हद्दवाढीचा मुद्दा रखडलेला आहे. त्यावर तोडगा म्हणून 2017 साली कोल्हापूर महापालिकेसह 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. दरम्यान, कोणत्या ना कोणत्या कारणाने शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा वाजत राहिला. विकास प्राधिकरणही कासव छाप ठरले. हद्दवाढ व्हावी आणि हद्दवाढ होवू नये या दोन्ही मुद्यावरुन शहर आणि ग्रामीण भागात कृती समिती कार्यरत राहिली. एकमेकांच्या सेवा रोखण्याची दोन्ही बाजूंनी भाषा सुरू झाली. शहर आणि ग्रामीण भागासाठी विकासाचा सेतू भरकटला. दोन्ही बाजूंनी वातावरण दुषीत होण्याचा धोका निर्माण झाला. यावर तोडगा म्हणून दोन्ही कृती समितींनी एकत्र येवून वादग्रस्त तसेच अमान्य मुद्दयावर चर्चा करण्याचे ठरले. गुरूवारी (दि. 23) हद्दवाढ समर्थक समितीने विरोधी समितीला एकत्रित बैठकीचे आवाहन केले होते.
या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत नारायण पोवार आणि राजू माने यांनी बाजू विषद केली. नारायण पोवार म्हणाले, सोमवारी दि. 26 सप्टेंबरची बैठक पुढे ढकलली आहे. हद्दवाढ समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांची हद्दवाढ विरोधी समिती शिष्टमंडळाने भेट देऊन, सर्वांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. आर. के. पोवार व राजू माने विकासाच्या दृष्टीने एकमेकांच्या कायम संपर्कात राहतील असे ठरले.
जिल्हाधिकारी यांना दोन्ही कृति समितीच्यावतीने निवेदन देण्यात येईल. जिल्हाधिकारी व त्या क्षेत्रातील विविध अधिकारी, दोन्ही कृती समिती यांची जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेनुसार एकत्र संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. कोल्हापूर नागरी विकासक्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून 42 गावे व महानगरपालिका यांचा डेव्हलपमेंट प्लँन / विकास आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी व्हावी. त्यानंतरच कोल्हापूर शहर व 42 गावांचीच विकास होईल यावर चर्चा झाली. कोल्हापूर नागरी विकासक्षेत्र प्राधिकरणाने कोल्हापूर शहरासह 42 गावांचा डेव्हलपमेंट प्लँन सादर करावा, तसेच महानगरपालिकेने 42 गावांचा डेव्हलपमेंट प्लँन सादर करावा. त्यानंतरच हद्दवाढ किंवा प्राधिकरणाबाबत ठोस निर्णय आणि भूमीका घेण्यात येईल, असे दोन्ही समितींतर्फे ठरले राजू माने यांनी स्पष्ट केले.
समन्वयाने ठरणार विकासाची दिशा
हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आमने-सामने आल्याने शहर आणि ग्रामीण भागातील दुही वाढण्याचा धोका होता. आता समर्थक आणि विरोधक एकाच व्यासपीठावर येतील. यातून शहर आणि ग्रामीण भागाच्या जे हिताचे आहे त्याचा विचार करुन एकत्रित निर्णय घेतील. समन्वयाने शहर आणि ग्रामीण भागाच्या विकासाची दिशा यामुळे ठरण्यास मदत होणार आहे.
समिती निमंत्रक राहणार संपर्कात
जिल्हाधिकारी यांना देणार एकत्रित निवेदन
जिल्हाधिकारी यांच्या वेळेनुसार घेणार एकत्रित बैठक
42 गावांचा डेव्हलपमेंट प्लॅनसाठी प्राधिकरण आणि महापालिकेकडे पाठपुरावा करणार