राहुल गांधींना लोकसभेचे खासदारपद अपात्र ठरवल्यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनाला येताना प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी काळ्या पोशाखात हजेरी लावली. या निषेधाने पंतप्रधान मोदींच्या भारतात लोकशाही संपली’ असल्याचा संदेश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी मोदी सरकार तपास यंत्रणा आणि स्वायत्त संस्थांवर प्रभाव टाकत असल्याचा आरोपही केला.
माध्यमांशी बोलताना कॉंग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे मोदी सरकारवर टिका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही संपवत आहेत, हे आम्हाला दाखवायचे आहे त्यासाठी आम्ही सर्वजण काळ्या कपड्यात आलो आहोत. भाजपने आधी स्वायत्त संस्था संपवल्या. त्यानंतर निवडणुका जिंकलेल्यांना धमकावून अनेक राज्यामध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले. पण जे झुकले नाहीत त्यांना वाकवण्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआयचा वापर केला.” असा आरोप खरगे यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राहूल गांधींना ज्या ‘विजेच्या गतीने’ अपात्र ठरवले होते तो दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. अदानी प्रकरणाच्या संयुक्त संसदीय चौकशीच्या (JPC) मागणीचा जोर देत काँग्रेस प्रमुख पुढे म्हणाले कि, “अदानी प्रकरणावर सरकार गप्प का आहे? अदानी यांनी बेकायदेशीरपणे पैसे कमवले. तुम्ही जेपीसी स्थापन करायला का घाबरता?” असा सवाल केला. अदानी प्रकरणावर पुन्हा बोलावलेली संसदेची दोन्ही सभागृहे राहूल गांधींच्या अपात्रतेवर सुरू असलेल्या गदारोळात काही मिनिटांतच तहकूब करण्यात आली.