कर्नाटक सरकारची दडपशाही अन्यायकारक, अधिकाराची पायमल्ली
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
संविधानिक मार्गाने सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंगळवारी बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या हक्काच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी गेले असता कर्नाटक सरकारने दडपशाही करून संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली करत मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चाळीसहून अधिक नेत्यांना ताब्यात घेतले. याचा महाराष्ट्र एकीकरण समिती कंग्राळी खुर्द यांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
कंग्राळी खुर्द येथील श्री बाल हनुमान तालीम मंडळ, शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी निषेध करण्यात आला.
भारत देशाची घटना ज्या महापुरुषाने लिहिली त्यांच्या घटनेवरच देशाची वाटचाल सुरू आहे. अशा या महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनादिवशीच (मंगळवारी) लोकशाही मार्गाने आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक करून कर्नाटक सरकारने बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा अवमान केला आहे. त्यांना ईश्वर सुबुद्धी देवो, असेही निषेधवेळी विचार व्यक्त करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, प्रल्हाद पाटील, विनय पाटील, नारायण पाटील, विशाल पाटीलसह श्री बाल हनुमान तालीम मंडळ तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.