पुणे / प्रतिनिधी :
राज्यात सरकार स्थापन होऊन एक महिना होत आला, तरी दोनच मंत्री काम करत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, हा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचा अपमान आहे, याकडे लक्ष वेधत तसेच कुणी पालकमंत्री देता का पालकमंत्री, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदीप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले.
प्रशांत जगताप म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच काम करत असल्यामुळे अनेक बाबींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मागच्या एका महिन्यात राज्यातील विविध भागांमध्ये तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठले राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर एका महिन्यात इतक्या जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. राज्यातील या सर्व आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने अधिवेशन बोलवावे व ओला दुष्काळ जाहीर करत या 89 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार असताना 18 जुलै रोजी पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरविले होते. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर 25 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता 25 जुलै होऊनही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही. सरकारकडे बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला सरकारला भीती का वाटत आहे, असा सवालही जगताप यांनी यावेळी उपस्थित केला.
संभाजी महाराज स्मारकाचा निधी का थांबविला?
मविआ सरकारने पुण्यातील वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 265 कोटींचा आराखडा केला होता, त्याचा निधी थांबविण्यात आला आहे. राजषी शाहू महाराजांच्या कामासंबंधी निधी दिला होता, तोही थांबविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांचे जतन करण्यासाठी काही कामे हातात घेतली होती, त्यांचे शौर्य लोकांना कळावे, अशी त्यामागची भावना होती. या कामांचा निधी थांबविण्याचे काहीच कारण नव्हते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच झाले नव्हते, असे मतही जगताप यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अशक्य