जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱयांचा मोर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांना भविष्य निर्वाह निधी देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून तातडीने भविष्य निर्वाह निधी द्यावा, यासह इतर मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
अंगणवाडी कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच विविध योजनांमध्ये काम करत असतात. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार विविध कामे करत असतात. याचबरोबर लहान मुलांना पौष्टिक आहार देणे, गर्भवती महिलांना पौष्टिक आहार पोहोचविण्याचे काम करत असतात. याचबरोबर लसीकरण मोहिमेमध्येही कामे करत असतात. विविध विभागांमध्ये त्यांना कामासाठी जुंपण्यात येते. असे असताना निवृत्त झाल्यानंतर त्यांना भविष्य निर्वाह निधी, तसेच इतर कोणत्याही योजना दिल्या जात नाहीत. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा तातडीने सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचाऱयांना वेळेत वेतन दिले जात नाही. निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना भविष्य निर्वाह निधी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र सरकार देण्यास टाळाटाळ करत आहे. अंगणवाडींचे भाडेदेखील वेळेत दिले जात नाही. अंडी खरेदी करूनही त्याची रक्कमही दिली जात नाही. त्यामुळे या सर्व मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जे. एम. जैनेखान, दोड्डव्वा पुजारी, गोदावरी राजापूर, एम. व्ही. नेवगी, चन्नम्मा गडकरी, पार्वती सालीमठ, विजया कलादगी, मुनीरा मुल्ला, सी. एस. मगदूम, भारती सनदी, गुरव्वा मडिवाळ, सुवर्णा कमतगी यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या.