राज्यपाल गेहलोत : कणेरीमठ येथे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव
वार्ताहर / निपाणी, गोकुळ शिरगाव
संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ-वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत असल्यामुळे ऋतुमानात बदल होत आहेत. यामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना अटकाव करायचा असेल तर वेळीच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. पर्यावरण संवर्धनासाठी लोकजागृती व लोकसहभाग आवश्यक असल्याचे, प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवानिमित्त आयोजित ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र सुत्तूtर मठाचे शिवाराथी देशिके महास्वामीजी होते. व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भैयाजी जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिद्धेश्वर स्वामी महाराज आदी उपस्थित होते.
राज्यपाल गेहलोत पुढे म्हणाले, संत, ऋषी, मुनी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विषद केले आहे. पर्यावरणाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी सर्वांना कटिबद्ध व्हावे लागेल. या महोत्सवाकरिता उपस्थित साधू संतांनी पर्यावरणाच्यादृष्टीने समाजाला प्रेरित करावे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, या प्रदर्शनाचे चांगले परिणाम दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधानांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब आहे. महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ साधु संतांच्यावतीने काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा वेदघोषाच्या मंत्रात गणेशमूर्ती व शाल देऊन राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैया जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक भागेयाजी यांनी केले. स्वामी परमानंद यांनी आभार मानले.
लाखो लोकांनी उपस्थिती
अध्यक्षस्थानावरून श्री क्षेत्र सुत्तूर मठाचे शिवाराथी देशिके महास्वामी म्हणाले, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम् कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर व जागृती निर्माण व्हावी. संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली. त्यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.