प्रतिनिधी /पर्वरी
भावना व विचार याचा संगम असलेली चिंतनशील अशी कविता कवी मोहन कदम यांची आहे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल ग. सामंत यांनी केले. पर्वरी स्पोर्टस् ऍण्ड कल्चरल क्लब येथे मोहन कदम यांच्या माझी कविता या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार तथा गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष गुरुदास सावळ, निवृत्त प्रचार्य राया नरहरी नाईक, कवी प्रकाश तळवडेकर, कवी मोहन कदम, नीलेश बुगडे, रेषा बुगडे उपस्थित होते.
मोहन कदम यांनी आयुष्यातील अनुभवांना कवितेत मांडण्याचा यथोचित प्रयत्न केला आहे, असे गुरुदास सावळ म्हणाले. कवी कदम यांनी आपल्या आत्मानुभवाशी प्रामाणिक असून मनात निर्माण होणाऱया तरंगाना, वलयांना आपल्या कवितेच्या माध्यमातून शब्दरुप देण्याचा प्रयत्न केला आहे, असे राया नरहरी नाईक यांनी सांगितले.
माझी कविता हा काव्यसंग्रह वैविध्यपूर्ण तथा वाचनिय झाला असल्याचे मत प्रकाश तळवडेकर यांनी व्यक्त केले. यावेळी नीलेश बुगडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. आदिया नाईक हिने श्लोक सादर केला तर संगम भौंसुले यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश कदम यांनी आभार मानले.