कडेगांव / प्रतिनिधी
आज मानवी जीवन हे प्रसारमाध्यमांनी व्यापलेले आहे. माध्यमांमध्ये स्त्रियांचा वापर प्रसिद्धी व फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शैलजा माने यांनी केले. त्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर समाजशास्त्र विभाग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय अंतर्गत “प्रसार माध्यमे आणि स्त्रिया” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होत्या.
कार्यशाळेचे उद्घाटन ‘स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’चे उपाध्यक्ष मा. लालासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बापूराव पवार हे होते. यावेळी साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. शैलजा माने, प्रा. डॉ. स्वाती सरोदे उपस्थित होत्या. तसेच यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डी. ए. पवार, अग्रणी महाविद्यालय जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र महानवर उपस्थित होते. प्रारंभी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.
विविध प्रसारमाध्यमांच्यामुळे विचारांच्या देवाणघेवाणीसाठी चालना मिळते. आपले विचार प्रगल्भ होतात असे सांगून प्रा. डॉ. शैलजा माने पुढे म्हणाल्या की, आजचा विद्यार्थी हा माहिती-तंत्रज्ञान युगात वावरत आहे. आपल्या हातात असणारा मोबाईल हा अतिशय विषारी हत्यार असून याचा जपून वापर करावा असे सांगून सर्व प्रसारमाध्यमांचा विकास कसा कसा होत गेला याचे विवेचन केले.
यावेळी द्वितीय सत्रात प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलताना प्रा. डॉ. स्वाती सरोदे म्हणाल्या की, स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमांनी तेच केले आहे. त्यामुळे चांगल्या कार्यासाठी सुद्धा प्रसारमाध्यमांचा वापर चांगल्या प्रकारे करून घेता येतो, हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, आज प्रसार माध्यमामध्ये स्त्रियांची वेगवेगळी चित्रे रंगवली जातात. मात्र आपण जे चांगलं असेल तेच घ्यावे असे सांगून त्या शेवटी म्हणाल्या की, स्त्रियांचे वास्तव चित्र कधीच प्रसारमाध्यमांमधून रंगवले जात नाही. आपल्या समोर वेगळीच स्त्री प्रसार माध्यमातून उभी केली जाते हे दुर्दैव आहे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
“प्रसार माध्यमे आणि स्त्रिया” या विषयावर आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान अंतर्गत गुणवत्ता आम्ही कक्षाचे समन्वयक प्रा. डी.ए. पवार यांनी तर द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान प्राध्यापिका सौ. दयावती पाडळकर यांनी तर उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य बापूराव पवार यांनी भूषवले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य बापूराव पवार व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील, अग्रणी महाविद्यालय जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र महानवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय अंतर्गत कस्टलर झोन मधील पाच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.